अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या दोघांची जोडी कायमच चर्चेत असते. रणवीर दीपिकाबद्दलचे प्रेम जगजाहीरपणे मांडण्यासाठी कधीही मागेपुढे पाहत नाही. मग ते सोशल नेटवर्किंगवर दीपिकाच्या फोटोवर कमेंट करणं असो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये काहीतरी खट्याळ कमेंट करणं असो रणवीरची दीपिकाबद्दलची भूमिका कायम ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ अशा प्रकारचीच असते. असंच काहीसं घडलं नुकत्याच पार पडलेल्या एक पुरस्कार सोहळ्यामध्ये.

अभिनेता कार्तिक आर्यन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. अगदी मिश्कील स्वभाव आणि चॉकलेट बॉय इमेज असणाऱ्या कार्तिकने सूत्रसंचालन करताना दीपिका आणि रणवीरची चांगलीच मस्करी केली. कार्यक्रमादरम्यान कार्तिकने दीपिकाची एक छोटी मुलाखतही घेतली. या मुलाखतीमध्ये त्याने दीपिकाला एक भन्नाट प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नाला रणवीरने दिलेले उत्तर ऐकून सभागृहामध्ये एकच हसू फुटले.

काय विचारलं कार्तिकने?

दीपिकाला मुलाखतीमध्ये कार्तिकने बेडरुमसंदर्भातील एक मजेदार प्रश्न विचारला. “तुम्ही बेडच्या उजव्या बाजूने खाली उतरता की डाव्या?,” असा प्रश्न कार्तिकने विचारल्यानंतर दीपिकाला हसू अनावर झाले.

दीपिका काय म्हणाली?

कार्तिकचा प्रश्नच इतका मजेशीर होता की तो ऐकताच अनेकजण हसू लागले. आता या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे असे हावभाव दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. बराच विचार करुन दीपिकाने अखेर हसतच “उजव्या बाजूने” असं उत्तर दिलं.

रणवीर काय म्हणाला?

हाच प्रश्न कार्तिकने रणवीरला विचारला. अर्थात रणवीर काहीतरी भन्नाट उत्तर देणार याच अपेक्षेने त्याला कार्तिकने प्रश्न विचारला होता अन् झालं ही तसच. कार्तिकने दीपिकाचे उत्तर ऐकल्यानंतर “रणवीर तू काय सांगिशील याबद्दल” असा प्रश्न विचारला. यावर आधी रणवीर गोंधळलेला दिसला आणि त्याने केवळ ‘हॅ’ असं म्हणत थोडा वेळ विचार केला. त्यानंतर रणवीरने माईक हातात घेत अगदी गंभीरपणे, “उजवीकडून किंवा डावीकडून तर तेव्हा शक्य होईल तेव्हा मी तिला (दीपिकाला) बेडवरुन उतरु देईन,” असं उत्तर दिलं. त्यानंतर तो अगदी मिश्कील पद्धतीने हसला.

दीपिका लाजली

रणवीरने नेहमीप्रमाणेच दिलेले हे आगळेवेगळे उत्तर ऐकून आधी दीपिका गोंधळल्यासारखी वाटली. मात्र रणवीरचे उत्तर ऐकून सभागृहातील अनेक सेलिब्रिटी मोकळेपणे हसले. दीपिकानेही हसतच कार्तिकडे पाहत, “चला पुढे जाऊ…” असं म्हणत वेळ मारुन नेली.

दीपिका आणि रणवीरने सहा महिन्यांच्या रिलेशननंतर २०१८ साली १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात लग्न केले. या दोघांनी कोकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं. खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी असणाऱ्या या दोघांना ऑन स्क्रीन कमेस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. हे तिन्ही चित्रपट या दोघांच्या करियरमधील महत्वाचे चित्रपट ठरले आहेत. लवकरच हे दोघे कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटामध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असलेली ही जोडी ऑनस्क्रीनवर देखील पती-पत्नीच्या रुपात झळकणार आहेत.