गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेच्या निरोपाचा क्षण जवळ आला आहे. हा चाहत्यांसोबतच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंसाठी भावूक क्षण आहे. मालिकेविषयी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत मात्र अमोल कोल्हेंना अश्रू अनावर झाले.

मालिकेतील सर्व कलाकारांनी वढू बुद्रूक गावातील महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी मालिकेबद्दल बोलताना अमोल कोल्हे यांच्या अश्रुंचा बांध फुटला. “खरंतर नेमकं काय बोलायचं तेच सुचत नाहीये. पहिल्यांदाच अडखळलो असेन. पण एक स्वप्नपूर्ती आहे. माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. एक स्वप्न घेऊन गेली आठ-नऊ वर्षे आम्ही सगळे धडपडत होतो. झी मराठी वाहिनीचे आभार मानतो. काही चुकलं असेल तर माफ करा. काही राहून गेलं असेल तर जिवात जीव असेपर्यंत ते पूर्ण करण्याआधी कायम कटीबद्ध राहीन”, असे उद्गार त्यांनी काढले.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.