अभिनेता सलमान खानला भेटायला एका शाळकरी मुलाने थेट काश्मीरहून मुंबई गाठली. सलमान खान आज ना उद्या भेटेल या आशेवर तो चार महिने मुंबईतच राहत होता.  एका ‘मिस्ड कॉल’मुळे या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
 रूमान अमीन उर्फ नवाब (१५) असे या मुलाचे नावे आहे. २० नोव्हेंबर २०१३ रोजी वडिलांसमवेत तो नवी दिल्लीच्या आझादपूर येथे आला होता. तेथून त्याने पळ काढला आणि थेट मुंबई गाठली. वांद्रे येथील सलमान खानच्या निवासस्थानी तो गेला होता. ३- ४ दिवस थांबूनही त्याला सलमान भेटला नाही. काही दिवस तो वांद्रे परिसरातच छोटी मोठी कामे करून राहू लागला.  एकदा त्याने एका मित्राच्या मोबाईलवरून आपल्या नातेवाईकला ‘मिस्ड’ कॉल दिला. मुंबईहून ‘मिस्ड कॉल’ आल्याने या नातेवाईकाने पोलिसांना कळवल्यानंतर नवाबचा शोध लागला.