#MeToo या मोहिमेत आता अभिनेत्री कंगना राणावतने तिला आलेला एक किळसवाणा अनुभव सांगितला आहे. लोकांच्या गर्दीत मला एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येते, घृणा वाटते असे कंगनाने म्हटले आहे. एवढंच नाही तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे असंही कंगनाने म्हटलं आहे. कंगनाचा मणिकर्णिका हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिचा अनुभव सांगितला आहे.

याआधी कंगनाने क्वीन या सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. विकासने आपल्याशी असभ्य वर्तन केलं असं कंगनाने त्यावेळी म्हटलं होतं. मीटू मोहिमेमुळे अनेक लोक आता मुलींशी, महिलांशी, अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करताना विचार करतील. कारण आता या गोष्टी महिला पुढे येऊन सांगत आहेत. त्यासंदर्भात तक्रार दाखल केली जाते आहे ही या मोहिमेची सकारात्मक बाजू आहे असंही कंगनाने म्हटलं आहे.

कंगनाने मध्यंतरीच्या काळात राणी मुखर्जीने जे मत मीटू मोहिमेबद्दल मांडलं होतं त्याचंही समर्थन केलं आहे. तरुणींनी, महिलांनी स्वत:च्या रक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकलं पाहिजे. यांसारख्या गोष्टींचा शाळेच्या अभ्यासक्रमातही समावेश करावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असलं पाहिजे,’ असं मत राणीने मांडलं होतं. कंगनाने राणी मुखर्जीचं हे म्हणणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.