‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं अशा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी पुन्हा एकदा सर्वांनाच कपल गोल्स दिले आहेत. क्रिकेटच्या मैदानापासून ते बी- टाऊनच्या झगमगाटापर्यंत प्रत्येक ठिकाणी या जोडीच्याच चर्चा पाहायला मिळतात. सध्या या चर्चा रंगण्याचं निमित्तं ठरत आहे ते म्हणजे विराटने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. अनुष्काच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

‘हॅपी बर्थडे माय लव्ह… माझ्या आयुष्यातील सर्वाधिक सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती तूच आहेस…’, असं म्हणत त्याने अनुष्काला केक भरवातानाचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. बॉलिवूडमध्ये ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आता अभिनयासोबतच चित्रपट निर्मिती क्षेत्रातही ती सक्रिय झाली आहे. या कलाविश्वात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आपल्या पत्नीचा म्हणजेच अनुष्काचा विराटला नेहमीच अभिमान वाटतो. त्यांच्या रिलेशनशिपच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळी त्यांने अनुष्काच्या कामाचा आणि तिच्या कर्तृत्त्वाचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

विराटने अनुष्काच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्ट केलेल्या फोटोसोबत जे कॅप्शन लिहिलं आहे त्यातूनही त्याच्या याच भावना व्यक्त झाल्या आहेत. त्यातही अनुष्काच्याच वाढदिवसा दिवशी आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली आरसीबीचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आता सामना जिंकत विराट अनुष्काला खास भेट देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विराट आणि अनुष्का २०१७ मध्ये डिसेंबर महिन्यात एका खासगी सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाले होते. या दोघांनीही त्यांच्या नात्यात आलेले चढउतार आणि अडथळे पार करत आता हे स्टार कपल आनंदाचं आयुष्य जगत असून, एकमेकांच्या साथीने हा सुखद प्रवास करत आहेत.