बॉलीवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अर्थात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या लग्नाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. बॉलीवूडची सध्याची ही हॉट जोडी पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

रणवीर आणि दीपिका यांच्यातील प्रेमसंबंध सर्वश्रृत आहे. पण त्यांच्या लग्नाबाबतच्या केवळ चर्चा रंगत असताना थेट रणवीरलाच दीपिकासोबतच्या लग्नाविषयी विचारण्यात आले. तो म्हणाला की, “अरे क्या बात कर रहे हो यार, सुबह सुबह निंद भी पूरी नही हुई है. अब आया हू तो पता चलेगा” असे उत्तर दिले. रणवीरच्या या प्रतिक्रियेत आपला साखरपूडा आणि लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचा रोख होता. त्यामुळे या दोघांच्या साखरपुड्याच्या किंवा लग्नाच्या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा: ‘गुगल’कडून रणवीर सिंगला अनोखं ‘बर्थ डे गिफ्ट’

दरम्यान, दीपिका-रणवीर जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी असणाऱया श्रेयस पुराणीक यांनी चित्रपटात दीपिकाची निवड निश्चित झाल्याचे ट्विट केल्याची माहिती एका वेबपोर्टलने दिली होती. मात्र, कालांतराने हे ट्विटर अकाऊंट गायब झाल्याचे निदर्शनास आले आणि श्रेयस पुराणीक यांनी आपले ट्विटर अकाऊंट नष्ट केल्याची अफवा देखील पसरली होती. पुराणीक यांच्याकडून भन्साळी यांनी काम काढून घेतल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली.