बॉलिवूडमध्ये एकेकाळी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांनी सुपरहिट जोडी मानलं जायचं. ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘वेलकम’ या सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या या जोडीने २०१० मध्ये शेवटाच एकत्र चित्रपट केला. त्यानंतर या जोडीने एकदाही स्क्रीन शेअर केली नाही. मात्र तब्बल ९ वर्षांनंतर कतरिना आणि अक्षय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र झळकणार आहे. ९ वर्षांनंतर अक्षयसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे कतरिनाने नुकतंच सांगितलं आहे.

कतरिनाने काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचा अनुभव शेअर केला. “सूर्यवंशी या चित्रपटासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर मला आणि अक्षयला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. इतक्या वर्षानंतर अक्षयसोबत काम करतांना सुरुवातीला मी थोडीशी अस्वस्थ होते. मात्र ‘अॅक्शन’ हे शब्द कानावर पडल्यानंतर मी कंम्फटेबल झाले आणि माझे अवघडलेपणदेखील दूर झालं”, असं कतरिना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये अक्षय आणि माझी जी केमिस्ट्री दिसली होती. तिच केमिस्ट्री या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. अक्षय एक उत्तम सहकलाकार आहे”.

दरम्यान, सूर्यवंशी हा चित्रपट २०२०मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार डीसीपी वीर सूर्यवंशी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.