मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर केलेल्या टिप्पणीवरून चांगलाच वाद रंगला आहे. फेसबुकवर नवीन पोस्ट लिहित टिळेकरांनी काहीही झालं तरी गायिकेवर लिहिलेली पोस्ट मी डिलिट करणार नाहीच, असं ठामपणे सांगितलंय. 'बेसूर गाणं आणि गाणाऱ्या गायिकेचं मी कौतुक न केल्यामुळे अनेकांचे कान ठणकू लागले आहेत. त्यांना पोटदुखी पण सुरू झाली आणि त्यांचे पित्त उसळले आहे, जे मला येणाऱ्या कमेंट्समधून समजलं. शरद पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्यासोबतचे माझे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्या गायिकेच्या चाहत्यांनी, भक्तांनी बोंबलायला सुरुवात केली', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. सोबतच त्यांनी भाजपा नेते आणि माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 'मराठी तारका कार्यक्रम पोलीस निधीसाठी दोन वर्षांपूर्वी झाला. तेव्हा स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत हातात हात देताना. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिंमत केली त्या मागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून? राजकारणात काट्याने काटा काढायचो असतो आणि या कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मला करोडो रुपये मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय म्हणाल माझ्यावर टीका करणाऱ्या भक्तांनो?, असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. नेमका वाद काय? अमृता फडणवीस यांचं ‘तिला जगू द्या’ हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? असा सवाल महेश टिळेकरांनी केला होता.