दिग्दर्शक विजय देवकर यांचा शेतकऱ्यांना धीराचा सल्ला राज्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे, मात्र दुष्काळ कधी निसर्गनिर्मित तर कधी मानवनिर्मित असतो. कधी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका तर कधी स्वत केलेल्या चूका यामुळे माणुस आपसूक दुष्काळ म्हणजे दृष्ट काळात लोटला जातो. जीवनचक्राचे हे समीकरण ‘मुंगळा’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक विजय देवकर यांनी सांगितले. बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी, सुहास पळशीकर, ज्योती जोशी यांच्यासह निर्माता गौरव भानुशाली उपस्थित होते. देवकर यांनी मुंगळा चित्रपट शासन, प्रशासन व आपल्यालाही नागरिक म्हणून विचार करायला लावणारा असल्याचे नमूद केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांना मुंगळाच्या प्रवृत्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे. आज राज्यात पाणी प्रश्न पेटलेला असतांना तो सोडवण्यासाठी चंद्रावरचे पाणी हा पर्याय गंमतीदार पध्दतीने मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. भानुशाली यांनी आज बळीराजा उदास आहे. त्याची बेताची परिस्थिती असूनही फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होते, याकडे लक्ष वेधले. आश्वासने बंद करून त्यावर उपाय सुचवणे शक्य आहे हे चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आपल्याकडे एखाद्या आपत्तीत संधी साधुन स्वतचे भले कसे करता येईल अशी संधीसाधू माणसे भरपूर आहेत. या गर्दीतील एक चेहरा मी चित्रपटात साकारल्याचे सुहास पळशीकर यांनी सांगितले. ज्योती जोशी यांनी समाज आणि प्रशासन याच्या विरोधात उभे राहत आपल्या न्याय मागण्यांसाठी लढणाऱ्या एका विधवेची भूमिका आपण साकारल्याचे सांगितले. दळवी यांनी विनोदी ढंगाने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद केले. चित्रपटात लोकेश गुप्ते, गणेश यादव, दीपक करंजीकर, जर्नादन परब, भूषण घाडी, राम कदम, अमोल कुलकर्णी आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कथा पटकथा संवाद विजय देवकर यांचे असून सहाय्यक दिग्दर्शकाचे काम प्रवीण खामकर यांनी पाहिले. तांत्रिक बाजू विजय गावंडे, फै सल इम्रान, ब्रियांका बिरोल, अमोद दोषी, बाबूभाई हुलमानी आदींनी सांभाळल्या.