प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींमुळे आपण नैराश्यात असल्याचंही नेहानं काही दिवसांपूर्वी कबुलही केलं होतं. पण या दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा येण्यामागचं कारण काय होतं हे मात्र तिनं कधीही सांगितलं नव्हतं. अखेर महिन्याभरानंतर नेहानं मौन सोडलं आहे. हिमांशला माझा अमुल्य वेळ मी देत होते, तरीही मी वेळ देत नाही अशी त्याची नेहमीच तक्रार असायची तो माझ्या योग्यतेचा नव्हताच म्हणून मी नातं तोडलं, अशी प्रतिक्रिया देत नेहानं मौन सोडलं आहे.

‘माझं ब्रेकअप झालंय, ही माझ्या आयुष्यात घडलेली चांगली गोष्ट आहे. हिमांशसोबत असताना मी माझा संपूर्ण वेळ त्याच्यासाठी खर्च करायचे. माझा अमुल्य वेळ केवळ हिमांशसाठी मी राखून ठेवला होता. त्या काळात मला कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला अजिबात वेळ देता आला नाही. हिमांशसाठी इतकं करूनही त्याची या नात्याबद्दल सतत तक्रार असायची. तो माझ्या योग्यतेचा नव्हता. माझा अमुल्य वेळ मी एका चुकीच्या व्यक्तीसाठी खर्च करत आहे याची जाणीव मला झाली. जगात तुमच्या कुटुंबींयांपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नसतं हे मी यातून शिकले.’ असं नेहा एका मुलाखतीत म्हणाली.

हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदाच नेहानं त्यामागचं कारण सांगितलं आहे. इतकंच नाही तर मी आता सुखी आहे यापुढे मला कोणाच्याही प्रेमात पडायचं नाही असंही ती म्हणाली. नेहा आणि हिमांश लग्न करणार अशा चर्चा सुरू असताना एका अनपेक्षित वळणावर या दोघांचंही नातं संपलं. मात्र आता नेहानं या सर्वाचा विचार न करता पुढे जाण्याचं निश्चित केलंय. नेहानं जरी ब्रेकअपमागचं कारण सांगितलं असलं तरी हिमांशनं मात्र मौन धारण करणं पसंत केलं आहे.