अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पत्रकार व चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस त्यांचीसुद्धा चौकशी करणार आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव मसंद यांची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

‘रिपब्लिक वर्ल्ड’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती, “सुशांतच्या मृत्यूची अपेक्षा कोणी असेल असं मी म्हणत नाहीये. पण त्याला फसवलं गेलंय. लोकांनी स्वत:ला संपवून घ्यावं, हे या लोकांना पाहायचं असतं. मुंबई पोलीस आदित्य चोप्रा, महेश भट्ट, करण जोहर, राजीव मसंद यांची चौकशी का करत नाहीये? कारण ही चार लोकं खूप शक्तीशाली आहेत.” सुशांतच्या आत्महत्येनंतर राजीव मसंदलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. ‘मी टू’अंतर्गत सुशांतवर झालेले खोटे आरोप आणि त्याच्याविषयी सांगितल्या गेलेल्या इतर बातम्यांमध्ये मसंद यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३५ हून अधिक लोकांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.