‘दंगल’ फेम अभिनेत्री झायरा वसिमशी विमान प्रवासात झालेल्या असभ्य वर्तनाविषयी सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून झायराने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. त्या प्रसंगाविषयी सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी पुढे येत झायराला पाठिंबा दिला. आता आयटम गर्ल राखी सावंतने या संपूर्ण प्रकरणावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

घडलेल्या प्रसंगाविषयी राखीने सहानुभूती व्यक्त केली. पण प्रसंग घडताना ती गप्प का बसली हाच प्रश्न राखीला पडला आहे. ‘विमान मुंबईला पोहोचेपर्यंत ती शांत का राहिली? तिने आवाज उठवला पाहिजे होता, आरडाओरड केली पाहिजे होती. इतकंच नाही तर तिने थेट त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली पाहिजे होती. मी त्या ठिकाणी असते तर सहप्रवासी आणि विमानातील कर्मचारी माझ्याभोवती गोळा होईपर्यंत ओरडले असते. एक माणूस वाईट असला तरी विमानातील इतर व्यक्ती चांगल्या होत्या ना? त्यामुळे झायराने त्यावेळीच आवाज उठवला पाहिजे होता.’

वाचा : रोहितच्या ‘त्या’ सल्ल्याबद्दल अनुष्काने मानले आभार

झायराचा व्हिडिओ पाहून याआधी खुद्द कुस्तीपटू बबिता फोगटनेही झाल्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केली होती. त्यासोबतच तिने ‘दंगल गर्ल’ झायराला खऱ्या आयुष्यातही ‘धाकड’ होण्याचा सल्ला दिला होता.