कतरिना कैफ सेटवरील अनेक गोष्टींबद्दल सतत काही ना काही प्रश्न विचारत असल्याने दिग्दर्शक रोहित शेट्टी तिला वैतागल्याचे वृत्त आहे. कतरिनाच्या या सततच्या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला बराच त्रास झाल्याचे रोहितनं म्हटलं आहे. कतरिनाबरोबर ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटाच्या सेटवर काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल एका मुलाखतीमध्ये रोहित बोलत होता.

रोहित पुन्हा एकदा अॅक्शन सीनचा भरणा असलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’प्रमाणेच हा चित्रपटही पोलिसांवर आधारित असणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर कतरिना आणि अक्षय एकत्र काम करणार आहेत. कतरिना पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. याचसंदर्भात नुकतेच रोहितने एका मुलाखतीमध्ये कतरिनासंदर्भात तक्रार केली. सध्या रोहितने केलेल्या याच तक्रारीची चर्चा सोशल मिडियावर रंगताना दिसत आहे.

रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे ड्रामा, अॅक्शन, स्टंटबाजी, गाड्या, रंगेबीरंगी कपडे अशा गोष्टींचा भरणा असलेली कथा हे समिकरण आता सर्वांना ठाऊक झालं आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांचा साचा ठरलेला असतो. दिग्दर्शक करण जोहरप्रमाणे भरजरी कपडे आणि मोठ्या सेट्सवर रोहित जास्त भर देत नाही. मात्र यंदा रोहितबरोबर काम करत असलेली कतरिना मात्र कपड्यांच्या बाबतीत खूपच काळजी घेते. याच दोन वेगळ्या मतांमुळे अनेकदा आपल्याला कतरिनाच्या वागण्याचा कंटाळा यायचा अन् चीडचीड व्हायची असं रोहितनं म्हटलं आहे.

काय म्हणाला रोहित

शुटींगदरम्यानच्या एक किस्सा सांगता रोहितने कतरिना सतत प्रश्न विचारत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “ती चित्रपटामध्ये डॉक्टरची भूमिका करत आहे. तिला एका सीनसाठी सलवार कमीज घालण्यास सांगितला होता. त्यावेळी तीने हे योग्य दिसेल का?, कसं वाटेल ते असे अनेक प्रश्न विचारले. मला इतका विचार करायला आवडत नाही. मी एका ठरविक काळानंतर उत्तर देत नाही. म्हणजे ‘करड्या रंगाचा सलवार कमीज चांगला दिसेल का?’ असा प्रश्नही तिने मला विचारला होता. अगं बाई तो सलवार कमीज आहे. तू डॉक्टरच्या भूमिकेत आहे. काय फरक पडतो रंगाचा. तू तो घाल आणि ये ना सेट वर’ असं मला सांगावं लागलं होतं,” अशी आठवण रोहित शेट्टीने नो फिल्टर नेहा या कार्यक्रमात बोलताना सांगितली. ‘सूर्यवंशी हा मध्यवर्गीयांसाठी बनवलेला चित्रपट असून त्यामध्ये कपड्यांना महत्व असले तरी अगदी रंग वगैरेसारख्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही,’ असं रोहितला वाटते. ‘तिने हे कसं दिसेल, रंग चांगला वाटेल का असे प्रश्न विचारल्यावर मी तिला केवळ तू कपडे घाल आणि ये सेटवर एवढचं सांगायचो,’ असंही पुढे रोहित म्हणाला.

कतरिनाची निवड कशी केली?

कतरिनाची निवड कशी केली या प्रश्नाला उत्तर देताना या भूमिकेसाठी ती मला योग्य वाटली असं रोहित म्हणाला. “हे सगळं अचानक घडून आलं. कतरिनाला माझ्याबरोबर काम करायचं होतं. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं. त्यावेळी या चित्रपटासाठी कतरिना योग्य असेल असं मला वाटलं. या चित्रपटातील भूमिकेचे वय आणि कथेला साजेशी असल्याने कतरिनाला या चित्रपटामध्ये घेतलं,” असं रोहित म्हणाला.

सध्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची बॉलिवूडमध्ये खूपच चर्चा आहे. रोहित शेट्टी त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी आगामी प्रोजेक्टची माहिती देत असतो. ‘सिम्बा’च्या क्लायमॅक्समध्येही त्याने ‘सूर्यवंशी’ची घोषणा केली होती. या क्लायमॅक्समध्येही सिंघमची भूमिका वठविणारा अजय फोनवर अक्षयशी संवाद साधतांना दाखविण्यात आला होता. त्यामुळे रोहितच्या आगामी ‘सूर्यवंशी’मध्ये अजय, अक्षय आणि रणवीर या तिघांची जोडी जमणार असा अंदाज लावण्यात येत आहे. हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.