माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. जात-पात ही मानवानेच निर्मिली आहे. आज भारतातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत? असा सवाल करत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या बहुचर्चित नाटकाच्या ७००व्या प्रयोगाच्या निमित्ताने नागराज यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा ७०० वा प्रयोग पार पडला.

शुभारंभाच्या प्रयोगापासूनच चर्चेत राहिलेल्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने मागील सहा वर्षांमध्ये विविध ठिकाणी प्रयोग करीत ७०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. नागराज मंजुळेंखेरीज निर्माता-अभिनेता भरत जाधव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, आमदार दिलीप मोहिते-पाटील हे सुद्धा या प्रयोगाला उपस्थित राहून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’च्या टिमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

वाचा : स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन

एकविसाव्या शतकातही आपण जाती-पातीचं राजकारण करतोय याची घृणा येत असल्याचं सांगत नागराज म्हणाले की, ‘जातीला मी माझा खूप मोठा शत्रू मानतो. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहे. आजच्या पिढीला याच विचारांची खरी गरज आहे. या दोन थोर व्यक्तींनी कधीच जात-पात, धर्मभेद बाळगला नाही. हे नाटक पाहताना माझे डोळे पाणावले. कारण या नाटकातील विचार थेट हृदयाला भिडणारे आहेत.’

२०१२ मध्ये रंगभूमीवर अवतरलेलं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांची प्रस्तुती आहे. भगवान मेदनकर या नाटकाचे निर्माते आहेत. राजकुमार तांगडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत.