‘कॉफी विथ करण’च्या नव्या सिझनला १ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या सिझनची सुरुवात बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमानच्या मुलाखतीने झाली. यावेळी सलमानने त्याचे लग्न, नाती आणि जीवनातील काही महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला. संगीता बिजलानीसोबतच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण, काही ना काही गडबड झाल्याने लग्न तुटले आणि तिने माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनशी लग्न केले. कतरिना कैफ, रणबीर कपूर, शाहरुख खान आणि अन्य काही व्यक्तींबाबत सलमानने त्याचे मत व्यक्त केले.
सलमान त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींशी नजर मिळवत नाही. त्यावर तो म्हणाला की, हे सत्य आहे. मी कोणत्याही कार्यक्रमात गेलो आणि तेथे माझी जूनी प्रेयसी असेल तर मी त्यांच्यापासून लांब जातो. मला वाटतं त्यांच जीवन इतक सुखी चालू असताना त्यात माझ्यामुळे काही समस्या येऊ नये. माझ्यामुळे त्यांना काही होऊ नये, म्हणून मी लांब जातो. लोक समजतात मी स्वतःला अपराधी समजतो आणि त्यामुळे नजर फिरवतो तर ठीक आहे ना. मला त्याच्याशी काही नाही. संगीता बिजलानीशी माझे लग्न झाले नसले तरी आमच्यात चांगली मैत्री आहे आणि ती आमच्या घरीदेखील येते.
सलमानचं लग्न हा तर संपूर्ण बॉलीवूडसमोर असलेला मोठा प्रश्न आहे. त्याच्या प्रेयसींची यादी मोठी असली तरी तो अजून ‘व्हर्जिन’ (कौमार्य) असून, त्याने स्वतःला आपल्या होणा-या पत्नीसाठी वाचवून ठेवले असल्याचे तो म्हणाला.