रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या नियुक्तीवरून गेल्या काही दिवसात अनेक प्रश्न उभे करण्यात आला. त्यावरून बराच वाद झाला. सलमानवर न्यायालयात असलेले खटले आणि मुळात तो क्रिडापटू नाही हे त्यामागचे कारण होते. मात्र, या टीकांवर सलमानने काहीच प्रत्युत्तर दिले नव्हते. पण आता त्याने आपले मौन सोडले आहे.
पत्रकारांशी चर्चा करत असताना सलमान म्हणाला की, ए आर रहमान आणि सचिन तेंडुलकर यांच्या सदिच्छादूत नियुक्तीवर कोणीच प्रश्नचिन्ह  का उभे करत नाही. जसं प्रसारमाध्यमे मला लक्ष्य करत आहेत तसेच ते या दोघांबाबत का बोलत नाहीत. या दोघांमधला एक क्रिडापटूचं नाहीए आणि दुसरा केवळ एकाच प्रकारचा खेळ खेळतो. तसेच, सलमानने क्रिडापटूच्या व्याख्येवरही प्रश्नचिन्ह उभे केले. तो म्हणाला की, रहमानला क्रिडापटू म्हणवून घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय पदकाची गरज आहे का? जी मुले खेळांमध्ये सहभाग घेतात पण पदक पटकवू शकत नाही मग ती मुले क्रिडापटू नाहीत का? तसेच, जी मुले खेळाडूंचे अनुसरण करतात त्यांचा खेळाशी काहीच संबंध नाही का? मग तुम्ही मलाच का निशाणा करत आहात? असा सवाल सलमानने केला.
तुझ्यावर न्यायालयीन खटले आहेत असे म्हटले असता सलमान म्हणाला, असे किती तरी राजकारणी आहेत ज्यांच्यावर खटले चालू आहेत. जर राजकारण्यांनी त्यांचे पद सोडले तर मीदेखील माझे सदिच्छादूत पद सोडायला तयार आहे.