एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी शाहरूख व सलमान या दोन खान बंधुंमध्ये या निकोप स्पर्धेच्या पुढे जाऊन चांगलीच ‘तूतूमैंमैं’ झाली. परिणामी ‘कुछ कुछ होता है’, ‘करण अर्जुन’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या दोघांमध्ये गेला काही काळ शीतयुद्धही सुरू होते. मात्र भल्याभल्या राजकारण्यांमधील दरी सांधणाऱ्या इफ्तारच्या मेजवानीने या खानांनाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्यास भाग पाडले. आमदार बाबा सिद्धिकी यांनी वांद्रय़ाच्या हॉटेल ताज लँड एण्ड्समध्ये दिलेल्या इफ्तार मेजवानीत या दोघांचे सूत पुन्हा जुळले.
ज्या कतरिनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हे दोघे एकमेकांना भिडले होते, ती कतरिना सध्या रणबीर कपूरच्या मागे असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे परस्परांतील शीतयुद्ध आणि कडवटपणा इफ्तारच्या मेजवाणीत इराणी फिरनीसह गिळून टाकत त्यांनी एकमेकांना मिठीही मारली.