ईद, दिवाळी, आणि ख्रिसमससारखा सणांमधील सुट्टीचा हंगाम हा बॉलिवूडमध्ये चित्रपट प्रदर्शनासाठीचा सुयोग्य काळ समजला जातो. सणासुदीच्या काळात अनेकांना सुट्टी असल्याने या दिवसांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. अलिकडच्या काळात सलमान खान, शाहरूख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटांनी तर याच काळात आपले चित्रपट प्रदर्शित करून तिकिटबारीवरचे अनेक उच्चांक मोडून काढले. यावरून मग बड्या अभिनेत्यांमध्ये प्रसंगी वादाला तोंड फुटल्याचेदेखिल दिसून आले. असे असले तरी, बॉलिवूडचे आघाडीचे दोन खान, सलमान आणि शाहरूख हे अनुक्रमे ईद आणि दिवाळीदरम्यान आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रसिध्द आहेत.
सलमान खान आणि ईद हे तर आता समीकरणच बनून गेले आहे. परंतु या समीकरणातही बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने आघाडी घेतल्याचे दिसते. कारण दिवाळीच्या काळात आजवर शाहरूखचे तब्बल दहा चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (११९५), दिल तो पागल है (१९९७), कुछ कुछ होता है (११९८), मोहब्बतें (२०००), वीर जारा (२००४), डॉन (२००६), ओम शांती ओम (२००७), रा. वन (२०११), जब तक है जान (२०१२) आणि २०१४ सालच्या दिवाळीत त्याचा ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.