नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्रतिक रोशनच्या ‘काबिल’सोबत टक्कर घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘रईस’च्या प्रचारासाठी बॉलिवूड बादशहा शाहरुख खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात दिसेल. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या उपांत्यफेरीत शाहरुख-सलमान यांना एकत्रित पाहण्याचा आणखी एक क्षण दोघांच्याही चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ‘रईस’च्या निमित्ताने शाहरुख खान दुसऱ्यांदा या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख खानने ‘दिलवाले’ या चित्रपटाच्या प्रचारासाठी ‘बिग बॉस’च्या घरात उपस्थिती लावली होती. या चित्रपटामध्ये काजोल, वरुण धवन आणि क्रिती सेनन या नव्या बॉलिवूड कलाकारांनी शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केली होती. दोघांच्या उपस्थित रंगणाऱ्या या कार्यक्रमाच्या खास भागाचे चित्रिकरण २० जानेवारी २०१७ ला लोणावळ्यात  पार पडणार आहे.

शाहरुख आणि सलमान एकत्र येणे ही दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. सलमान खान आणि शाहरुख खान बॉलिवूड क्षेत्रात २५ वर्षाहून अधिककाळ अधिराज्य गाजविताना दिसते. दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट पैसा वसूल नव्हे तर हाऊसफुल चालतात. यातून त्यांचा दबदबा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. देशासह जगभरात या दोन अभिनेत्यांचे चित्रपट धमाल करतात. पण त्यांच्यातील वादानंतर ही जोडी पुन्हा एकाही चित्रपटात एकत्र दिसलेली नाही. दोघांच्या मैत्रीमध्ये दरी वाढत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यातील दरी कमी होत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात सलमान-शाहरुख एका व्यासपीठावर दिसले होते. या कार्यक्रमातून शाहरुखने अर्ध्यातूनच कार्यक्रम सोडला होता. या कार्यक्रमामध्ये पुरस्कार मिळाला नसल्यामुळे शाहरुख कार्यक्रमातून निघून गेल्याची चर्चाही बॉलिवूड वर्तूळामध्ये रंगली होती.

शाहरुख खानचा आगामी ‘रईस’ हा चित्रपट सध्या अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनला आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणारा हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या ‘रईस’ला टक्कर देण्यासाठी २५ जानेवारीला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे हृतिक रोशनचा ‘काबिल’. अंधत्व काय असते याची कल्पना अनेकजण करुही शकत नाहीत. पण, अंध व्यक्तिंच्या भावनांचा विचार करता त्यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना सहानुभूती असते. याच अंधत्वाचा अनुभव घेत अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या ‘काबिल’ या चित्रपटामध्ये एक अंध व्यक्तिरेखा साकारली आहे.

हृतिकच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक आणि यामी दोघेही अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.