गेल्या काही दिवसांपासून तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर हा वाद बॉलिवूडमध्ये चांगलाच पेटला आहे. नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीनं गंभीर आरोप केल्यानंतर एकच खळबळ पुन्हा माजली आहे. बॉलिवूडमधले अनेक कलाकार तनुश्रीच्या बाजूनं उभे राहिले आहेत. तर अमिताभ बच्चन, आमिर खान यांसारख्या कलाकारानं यावर मौन धारण करण्याचा पर्याय स्विकारला आहे.

काहीतरी लाज बाळगा, अक्षय कुमार, फराह खानला तनुश्रीनं फटकारलं

या प्रकरणावर बॉलिवूडचा खलनायक शक्ती कपूर यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर विनोदनिर्मिती करत त्यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं. ‘गेल्या काही दिवसांपासून मी अमेरिकेत होतो. मला तनुश्री- नानांमध्ये काय वाद आहे हेच माहित नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी सुरूवातीला दिली. हे प्रकरण माध्यमांतील काही लोकांनी शक्ती कपूर यांना सविस्तर सांगितले. मात्र तनुश्री- नानांमधला वाद हा १० वर्षे जुना आहे असं कळल्यानंतर ‘१० वर्षांपूर्वी तर मी खूपच लहान होतो’ अशी विनोदी प्रतिक्रिया देत शक्ती कपूर यांनी नाना- तनुश्रीच्या वादावर बोलणं टाळलं.

२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केला. या प्रकरणावर जेव्हा अमिताभ बच्चन यांनी बोलणं टाळलं तेव्हा तनुश्रीनं बच्चन यांच्यावरही टीका केली. ‘त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मी खूप दुखावले आहे. आपल्या चित्रपटातून सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाईल अशा प्रकारचे चित्रपट करण्याचा आग्रह त्यांचा असतो. मात्र तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीसोबत वाईट गोष्ट घडत आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या पाठी उभं राहण्याचं सोडून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हे साफ चुकीचं आहे’ असं म्हणत तिनं बच्चन यांच्यावर टीका केली होती.