सध्या दिग्दर्शक अली अब्बाल जफर यांच्या ‘भारत’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानसह जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर,दिशा पटानी, नोरा फतेही हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सध्या सलमान आणि कतरिना या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

दरम्यान हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनासाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. सलमान आणि कतरिनाला शोमध्ये पाहता चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली होती. तर दुसरीकडे चाहते ऐकेकाळी कपिल शर्मा शोचा भाग असलेल्या सुनील ग्रोवरची वाट पाहत होते. परंतु सुनील ग्रोवरने या शोमध्ये येणे टाळले.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील ग्रोवरला कपिल शर्मा शोमध्ये न जाण्यामागील कारण विचारण्यात आले होते. त्यावर ‘मी जाणे गरजेचे नव्हते. ज्या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ आहेत तिकडे दुसरे कुणी प्रमोशनसाठी जावे असे मला वाटत नाही. तसेच माझी इच्छा देखील नव्हती म्हणून मी गेलो नाही’ असे सुनील ग्रोवर म्हणाला.

भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा काम करणार का असा प्रश्न देखील सुनीलला विचारण्यात आला होता. ‘एखाद्या प्रोजेक्टमधील आपली भूमिका कितीकाळ टिकेल हे आपल्या नशीबावर अवलंबून असते. जर देवाची इच्छा असेल तर भविष्यात कधीतरी एकत्र काम करु. हा नशीबाचा भाग आहे. तसेच काही चांगल्या गोष्टी देखील आहेत.. मला इतकी प्रसिद्धी मिळाली, लोकांचे प्रेम मिळाले, बराच वेळ आम्ही एकत्र घालवला. या काही आठणी आहेत ज्या माझ्यासोबत कायम राहतील’ असे सुनीलने उत्तर दिले.

‘भारत’ या चित्रपटात सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर ‘भारत’ आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत.