‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या चर्चेत आला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सुशांतने ‘बेफिक्रे’या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. ‘बेफिक्रे’ या चित्रपटासाठी आपल्याला कधीच विचारण्यात आले नव्हते आणि जरी तसे विचारण्यात आले असते तरी अशा प्रकारचा चित्रपट आपण केला नसता असे वक्तव्य सुशांतने केले.

‘मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मला कधीही ‘बेफिक्रे’ या चित्रपटासाठी विचारण्यात आले नव्हते आणि जर का मला या चित्रपटासाठी विचारण्यात आले असते तरीही मी तो चित्रपट केला नसता. चित्रपटाबद्दल इतरांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर चित्रपट नाकारणे सोपे होते. पण, माझ्याकडे त्यासाठीचे कारण आहे. मात्र त्याच निर्मिती संस्थेने मला ब्योमकेस बक्षी सारख्या चित्रपटाची ऑफर दिली असती तर मी नक्कीच होकार दिला असता’, असे सुशांत या मुलाखतीदरम्यान म्हणाला.

‘बेफिक्रे’बद्दल आणखीन बोलताना सुशांत म्हणाला की, ‘जर या चित्रपटामध्ये भारतातील सध्याच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे कथानक साकारण्यात आले असते तर या चित्रपटाने नक्कीच चांगली कमाई केली असती. पण, तसे काहीही झाले नाही’. यापुढे सुशांत असेही म्हणाला की, ‘मी असं नाही सांगू इच्छित की चित्रपटाद्वारे नेहमीच वास्तवदर्शी कथानक साकारले जावे. त्यात काही काल्पनिक चित्रपटांचाही समावेश असू शकतो. जे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वीसुद्धा होतात’.

सुशांतच्या या वक्तव्याने सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये अशाही चर्चा रंगत होत्या की सुशांत सिंग राजपूतलाही ‘बेफिक्रे’ या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. पण आता मात्र सुशांतच्या बोलण्यावरुन तसे जाणवत नाहीये. सुशांत सिंग राजपूत आणि रणवीर सिंगमध्ये सध्या ‘ऑल इज नॉट वेल..’ अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे म्हटले जात आहे. रणवीर सिंग आणि आदित्य चोप्रा यांची वाढती सलगी या वादाचे कारण समजले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या काळात सुशांत सिंग राजपूत आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये असलेल्या या वादाला कोणते नवे वळण मिळणार…याबद्दलच्या बऱ्याच चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहेत.