बॉलिवूडमध्ये अभिनेत्री तब्बूने एक मोठी कारकीर्द गाजवली आहे. ८०-९० च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बॉलिवूडची एकेकाळची ही आघाडीची अभिनेत्री लवकरच ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. १९९४ मध्ये तब्बूच्या करिअरला वेगळं वळण मिळालं. तेव्हा ती अभिनेता अजय देवगणसोबत ‘विजयपथ’ चित्रपटामध्ये दिसली. तब्बू आणि अजयच्या जोडीला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. आजच्या घडीला अजय देवगण काजोलसोबत सुखाने संसार करतोय. तर तब्बू अजूनही अविवाहीत आहे. पण, अचानक या जोडीबद्दल बोलण्याचे कारण काय? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. कारण, नुकतंच तब्बूने तिच्या अविवाहित असण्यामागे अजय कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

वाचा : जाणून घ्या, आदिनाथ कोठारे का मानतोय पंतप्रधान मोदींचे आभार

एका मुलाखतीत तब्बू मस्करीत म्हणाली की, अजय आणि मी एकमेकांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो. अजय हा माझा चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी असून, माझा खूप चांगला मित्र आहे. मी माझे करिअर सुरू केले, तेव्हापासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात समीर, अजय दोघेही माझं रक्षण करण्यासाठी माझ्या मागावर असायचे. माझ्याशी बोलण्यासाठी कोणी मुलगा पुढे जरी आला तरी ते त्याला धमकावायचे. दोघेही तेव्हा प्रचंड उनाड होते. आज मी सिंगल असण्याचं कारण केवळ अजय आहे. त्याच्या अशा वागण्याचा त्याला आता पश्चाताप होत असावा अशी मी अपेक्षा करते.

वाचा : वैभव-पूजाच्या प्रेमाची हटके कहाणी

तब्बू इतक्यावरच थांबली नाही. तर तिने अजयला तिच्यासाठी मुलगाही शोधाण्यास सांगितले होते. याविषयी ती म्हणाली की, एकेदिवशी मी त्याला म्हणाले माझ्यासाठी आता कृपा करून एक मुलगा शोध. हा विनोदाचा भाग झाला. पण आम्ही बऱ्याचदा एकत्र काम केल्यामुळेच आज आमची मैत्री अधिक घट्ट आहे. सर्व अभिनेत्यांमध्ये निवड करण्याची वेळ आलीच तर मी अजयचे नाव घेईन. तो एक बालिश पण संरक्षणात्मक व्यक्ती आहे. तो जेव्हा सेटवर असतो तेव्हा सेटवर अगदी खेळीमेळीच आणि प्रसन्न वातावरण असतं. आमच्यात एक वेगळच नात आहे.

तब्बू – अजय या जोडीने ‘हकीकत’,‘तक्षक’,‘फितूर’, ‘विजयपथ’ आणि ‘दृश्यम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘गोलमाल ४’मध्ये ते एकत्र दिसणार आहेत.