‘बिग बॉस’चे हे पर्व सलमान खानसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे शोच्या नैतिकतेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या सलमानने कुशाल आणि तनिषाच्या भांडणावर टीकाटिप्पणी करताना तुमची भांडणे अशीच चालू राहिली तर ‘बिग बॉस’चे हे माझे अखेरचे पर्व असेल, असे सलमानने छातीठोकपणे सांगितले. पण, सलमानच्या या इशाऱ्याचा घरातील सदस्यांवर काहीही परिणाम झाला नाही. त्याउलट, कुशाल आणि अँडीमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले आणि परिणामस्वरूप कुशालला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आले. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या पर्वात बॉसच्या आज्ञेला खुंटीवर टांगून तुमचे मत पटले नाही म्हणून सरळ बाहेर पडण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच झाला असून आता यावर सलमान काय पाऊल उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘बिग बॉस’च्या घरातील भांडणांचा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून शनिवारच्या भागात सलमानने कुशाल, तनिषा, प्रत्युषा, कामया, गौहर सगळ्यांचीच झाडाझडती घेतली. पण, तनिषा आणि कुशालच्या भांडणात त्याने कुशालची बाजू कशी चुकीची आहे हे दम देऊन सांगितले. तनिषा कुठल्या कु टूंबातून आली आहे बघा.. ती अशी वागेलच कशी?, हा सलमानने लावलेला सूर घरातील इतर सदस्यांना दुखावून गेला. त्यामुळे सलमानच्या दटावणीनंतर घरातील सदस्य एकत्र आले आहेत असे वाटत असतानाच त्यांचे एकत्र येणे हे अळवावरचे पाणी ठरले आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कचे निमित्त साधून अँडीने गौहरला नको त्या विषयांवरून चिडवले. टास्क संपल्यानंतर गौहरने अँडीला यावरून सुनावले आणि बस्! पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. कुशाल आणि अँडीचे जोरदार भांडण झाले. कुशालने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. अखेर, कुशालच्या या गैरवर्तणूकीची दखल घेत बिग बॉसने कुशालला घराबाहेर जाण्यास सुनावले. गौहरनेही कुशालबरोबर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घरातील अन्य सदस्यांनी समजवायचा प्रयत्न करूनही गौहर कुशालबरोबर बाहेर पडली.
आत्तापर्यंतच्या पर्वात पहिल्यांदाच असे घडले असून आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच सलमान ‘बिग बॉस’च्या पुढच्या पर्वातून काढता पाय घेणार का?, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या सगळ्या तमाशावर सलमानचे जाहीर उत्तर येत्या शनिवारीच कळणे अपेक्षित आहे.
तनिषाची बाजू घेतल्याचा  फटका
तनिषाची बाजू घेऊन सलमानने घरातील इतर सदस्यांना डावलले असल्याची भावना केवळ घरातील सदस्यांमध्येच नाही तर सलमानच्या चाहत्यांनाही त्याच्या या कृतीचे वाईट वाटले आहे. तनिषा एका प्रथितयश कुटूंबातून आली आहे याचा अर्थ ती सुसंस्कारित आहे असा कसा होऊ शकतो?, हा सलमानच्या चाहत्यांचा प्रश्न असून एकूणच त्याच्या वक्तव्यांविषयी त्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.