इटलीतील टस्कनी येथे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विरुष्काने अवघ्या ४४ लोकांच्या उपस्थितीत लग्न केले असले तरी मित्र- परिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी दिल्लीत २६ डिसेंबर रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात रिसेप्शन पार पडणार आहे. दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकांची झलक सोशल मीडियावर याआधी पाहायला मिळालेली. आता मुंबईतल्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या आमंत्रण पत्रिकेवर विरुष्काने त्यांच्याच अंदाजात एक खास संदेश दिला आहे.

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही आमंत्रण पत्रिका पोस्ट करत विराट- अनुष्काला शुभेच्छा दिल्या. या पत्रिकेसोबतच एक रोपटे पाहायला मिळत आहे. हे रोपटे लावून पर्यावरण रक्षणाचा अनमोल संदेश विरुष्काने पाहुण्यांना दिला आहे. हे पाहून श्रीलंका दौऱ्यादरम्यान विराट आणि अनुष्काने केलेल्या वृक्षारोपणाची नक्कीच आठवण येते.

वाचा : गुगल सर्चमध्ये ‘बाहुबली २’च अग्रस्थानी

मुंबईतील रिसेप्शनसाठी बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नानंतर विराट मुंबईत येणार की अनुष्का दिल्लीत जाणार असाच प्रश्न अनेकांनाच पडलेला. पण, आता त्याचेही उत्तर जवळपास सर्वांनाच मिळाल्याचे कळते आहे. हे दोघंही लग्नानंतर पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार असून, स्वप्ननगरी मुंबईत संसार थाटणार आहेत.