बॉलीवूड अभिनेत्री काजोल एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एवढच नाही तर अभिनेता शाहरुख खानसोबत तिने अनेक हिट चित्रपट दिले. पण मध्यंतरीच्या काळात ही जोडी मोठ्या पडद्यावरून गायब झाली असली तरी २०१५ मध्ये ‘दिलवाले’ चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे पुन्हा एकत्र झळकले. पण काजोलला सुरुवातीला हा चित्रपट करायचा नव्हता. नंतर एका जवळच्या व्यक्तीनेच तिला या चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने हा चित्रपट साइन करण्याआधी घडलेला एक किस्सा शेअर केला आहे.

काजोलने अनुपम खेर यांच्या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती आणि यावेळी तिने दिलवाले हा चित्रपट केवळ मुलगी न्यासामुळे साइन केल्याचे कबुल केले. जेव्हा काजोलला या चित्रपटासाठी विचारण्यात आले त्यावेळी काजोल हा चित्रपट करावा की नाही या संभ्रमात होती. चॅट शोमध्ये या चित्रपटाची आठवण शेअर करताना काजोल म्हणाली, जेव्हा तुम्ही एक आई असता आणि आपल्या मुलांपासून दूर राहून तुम्हाला काम करावे लागते तेव्हा तुम्हाला दुःख होते. आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने अपराधीपणाची भावना मनात येते. जेव्हा मला ‘दिलवाले’साठी विचारण्यात आले तेव्हा मी चित्रपट करावा की नाही याबाबत संभ्रमात होते. त्यावेळी फक्त न्यासामुळे हा चित्रपट मी साइन केला. कारण तिने मी हा चित्रपट का साइन करावा याबाबत माझी समजूत काढली. ती असे काही म्हणाली की माझ्या डोळ्यात पाणी आले मला त्यावेळी हसावेसेही वाटत होते आणि रडावेसे सुद्धा वाटत होते.

काजोलने या मुलाखतीत सांगितले, न्यासाला जेव्हा या चित्रपटाबद्दल समजले तेव्हा ती खूप आनंदी झाली होती. ती मला म्हणाली आई तू हा चित्रपट करायला हवा. मी म्हटले, मी माझ्या मुलांपासून दूर राहून काम कसे करू शकते मला तुमच्या सोबत असायला हवे. त्यावर न्यासा म्हणाली, आई तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे पण याचा अर्थ असा नाही की तू दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर प्रेम करत नाहीस. तिचा हा समजूतदारपणा पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते.

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतात ज्यामुळे तिला ट्रोल सुद्धा केले जाते. न्यासा सिंगापूरला आपले शिक्षण पूर्ण करत आहे.