|| दिलीप ठाकूर

…अॅण्ड ऑस्कर गोज टू असे म्हटल्यानंतर अगदी काही सेकंदाचा पाॅझ येतो, तसा आला आणि मग एका भव्य स्टेजवर एकाद्या हिंदी अथवा भारताच्या कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचे नाव घोषित होते हे फक्त आणि फक्त स्वप्नच राहणार की काय?

याचे उत्तर ‘होय’ नक्कीच असेल, कारण आपण ऑस्करच्या मुख्य विभाग तर जाऊ द्याच, पण परदेशी विभागातही नामांकन मिळवण्यासाठी पात्र ठरत नाही. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान ‘ ( २००१) हा त्या विभागात नामांकन मिळवलेला आपला शेवटचा चित्रपट होय. म्हणजेच तब्बल अठरा वर्षे आपली फक्त एकाद्या चित्रपटाची प्रवेशिका जाते, त्याची मोठी बातमी होते, चॅनेल्सवर छान चर्चा रंगते, ऑस्करच्या नियमानुसार काही प्रयत्नही होतात आणि मग एके दिवशी समजते की, आपला चित्रपट अगदी प्राथमिक फेरीतच बाद ठरला. दुर्दैवाने त्यावर आपल्याकडे फारशी प्रतिक्रियाही उमटत नाही, अगदी मंथन जाऊ देत, त्यामागच्या कारणांचा फारसा विचारही होत नाही, याचे कारण नवीन चित्रपटांचे प्रमोशन, मार्केटिंग, रिलीज आणि उत्पन्नाचे खरे-खोटे आकडे, या जोडीला ग्लॅमरस इव्हेन्टसचे सातत्य यातच आपली चित्रपटसृष्टी अशी आणि इतकी रममाण असते की, ऑस्कर हा आपला प्रांतच नव्हे, असे वाटावे असाच हा सगळा माहौल असतो. अथवा आपोआपच ऑस्करकडे दुर्लक्ष होते.

ग्लोबल युगात खरं तर जगभरातील चित्रपट अधिकाधिक प्रमाणात आता आपल्यापर्यंत पोहचतोय. पूर्वी एक तर इंग्रजी चित्रपटांची म्हणून काही चित्रपटगृहे असत ( मुंबईत रिगल, स्टर्लिंग) अथवा क्लासिक विदेशी चित्रपट पाहण्यासाठी एक तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अथवा फिल्म सोसायटी ही माध्यमे असत. आता नवीन पिढी चांगले शिक्षण घेतेय, त्यांची जगभरातील अनेक गोष्टींबद्दल चांगली समज आहे, ते ऑनलाईन जगभरातील चित्रपट पाहतात. त्याना ऑस्करपासून आपला चित्रपट खूपच दूर आहे, याची पटकन जाणीव होणे स्वाभाविक आहे. आणि आपला चित्रपट जगात नेमका कुठे आहे असा त्यांना प्रश्न पडू शकतो. त्याचे काय उत्तर आहे ? पण ऑस्कर विजेता जाऊ दे, किमान नामांकन पात्र चित्रपट आपण का निर्माण करु शकत ? इच्छाच नाही की तसा सकारात्मक दृष्टिकोन नाही? की आतापर्यंत जे शक्य झाले नाही त्याचा आपण कशासाठी विचार करायचा ही वृत्ती? आपल्याकडे चित्रपट निर्मिती करताना प्रामुख्याने तरी ‘प्रेक्षकांना काय आवडेल ‘ असा व्यावसायिक दृष्टीकोन असतो ( काही अपवाद) , मी अमुक विषयाला न्याय देईन, असा दिग्दर्शनीय गुणात्मक दृष्टिकोन हवा. तसा असतो तेव्हा त्याला कलात्मक अथवा समांतर चित्रपट म्हटले जाते. ते काही असले तरी, आपल्याकडचा चित्रपट ऑस्करला पाठवायच्या प्रक्रियेची माहिती असावी लागते. चित्रपट फेडरेशनच्या वतीने देशभरातील विविध भाषांतील चित्रपटाशी संबंधित एक समिती नेमली जाते. अगोदरच्या वर्षातील १ ऑक्टोबर ते या वर्षीचे ३० सप्टेंबर या बारा महिन्याच्या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा त्यासाठी प्रवेश अर्ज करु शकतात. ती समिती एक चित्रपट ऑस्करसाठीच्या आपल्या प्रवेशिकेची निवड करते, त्यानंतर अमेरिकेत जाऊन ऑस्करचे नियम समजून घ्यावे लागतात. थोडी दीर्घ प्रक्रिया आहे, पण सर्वोत्तम प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी गुणवत्ता ते विविधतामय वाटचाल असा प्रवास करायला हवा. आशुतोष गोवारीकरने ‘लगान ‘साठी लाॅस अॅन्जेलिस येथे जाऊन ते नियम समजून घेतले, तसे शो आयोजित केले आणि गुण मिळवले आणि ‘लगान ‘ला ऑस्कर मिळण्याची आशा वाढवली. नंतर ते नियम बदललेत, पण मुळात गुणवत्तेपासून सुरुवात व्हावी. कारण तीच जास्त महत्वाची असते.

ऑस्कर आणि मराठी चित्रपट हे नाते पुन्हा वेगळे. साधारण ‘माहेरची साडी ‘ ( १९९१) खणखणीत यशस्वी ठरल्यावर नव्वदच्या दशकात ‘कसला हो मिळतोय, मराठी चित्रपटाला ऑस्कर?’ असा परिसंवादात थट्टेचा विषय असे. गंमत म्हणजे, त्याला रसिकांची दाद मिळे. पण संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास ‘ ( २००३) ची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून त्यावर्षीच्या रमेश सिप्पीच्या नेतृत्वातील निवड समितीने निवड करताच ती ब्रेकिंग न्यूज ठरली, वृत्तपत्रांनी हेडलाईन केली. त्यामुळे एकूणच मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात प्रचंड उत्साहाची लाटच आली. खरं तर ती फक्त प्रवेशिका होती, पण ‘लगान ‘पासून आपण जणू ऑस्करच्या जवळ पोहचल्याचा फिल असल्याचा ‘श्वास ‘ला फायदा झाला, ‘लगान ‘पूर्वी काय व्हायचे माहित्येय? आपला एकादा चित्रपट ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून निवडल्याची बातमी येई आणि जाई इतकेच. अगदी प्रशांत आणि ऐश्वर्या राय यांची भूमिका असलेला ‘जीन्स ‘ ( तमिळ, मग हिंदीत डब) हादेखिल आपण ऑस्करला पाठवला. त्यामुळे एकूणच या गोष्टींमुळे ऑस्कर खूपच दूरवरचे ठिकाण वाटे.

‘श्वास ‘ही प्राथमिक फेरीतच बाद ठरला, पण केवळ त्याच्या ऑस्करसाठीच्या आपल्या प्रवेशिकेने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला प्रचंड उर्जा मिळालीय. ‘श्वास ‘ पूर्वीचा आणि नंतरचा, असाच कायम मराठी चित्रपटाचा विचार होतो. मराठीत कसदार कलाकृती निर्माण होतात असा अमहाराष्ट्रीय प्रेक्षकांनाही त्यामुळे विश्वास मिळाला. तो खूप महत्वाचा आहे. त्यानंतर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ आणि चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट ‘ याही चित्रपटांची ऑस्करसाठीची आपली प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि मराठी चित्रपटाच्या बाजूने वातावरण राहिले, एक प्रकारचे ते टाॅनिकच ठरले. एकाद्या मराठी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेतही एकादा सिनेमावाला आपला चित्रपट ऑस्करला पाठवणार असे उत्साहाने सांगत बातमीला जन्म देऊ लागला. खरं तर, ऑस्कर मिळण्याचे स्वप्न आणि वास्तव यातले अंतर विचारात घ्यायला हवे, पण ते काहीना गरजेचे वाटत नसेल तर?

इतर भाषेतील चित्रपटांचीही ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड होत असतेच. यावेळी आसामी चित्रपट ‘ व्हिलेज राॅक स्टार ‘ निवडला गेला, त्याच्या निवडीमागचे एक कारण म्हणजे, आसामी चित्रपटसृष्टीत आत्मविश्वास, उमेद वाढावी हे होते. तर या चित्रपटाच्या अमेरिकेतील ऑस्कर प्रक्रियेच्या खर्चासाठी आसाम शासनाने एक कोटी रुपये दिल्याची बातमी होती. ऑस्कर पुरस्कारासाठी असे खर्च असतातच. म्हणजेच गुणवत्तेसह अशा आर्थिक बळाचीही गरज असते. ‘लगान ‘च्या वेळेस निर्माता आमिर खान होता आणि या चित्रपटाबाबत तो आणि आशुतोषला विश्वासही होता.

असो, पण आपल्या देशात तुळू, कोंकणी, नेपाळी इत्यादी लहान मोठ्या मिळून जवळपास पंचवीस तीस भाषेत वर्षभरात एक हजारपेक्षा जास्त चित्रपट निर्माण होतात, त्या संख्येचा विलक्षण अभिमान असला तरी ऑस्करचे किमान नामांकन पात्र होईल असा एक तरी चित्रपट कधी बरे निर्माण होईल ? बायस्कोपपासून मल्टीप्लेक्सपर्यंत आणि चार आण्याच्या तिकीटापासून हजार बाराशे रुपयांच्या तिकिटापर्यंत ( ठग्ज ऑफ हिन्दुस्तानचे काही ठिकाणी होते) आपण प्रगती करतोय,पण जगभरातील चित्रपटात आपली ओळख आणि स्थान काय? गंमत म्हणजे, आता मराठी, हिंदीसह रजनीकांतचे तमिळ चित्रपटही अनेक देशात प्रदर्शित होतात, पण याच चित्रपटाना प्रतिष्ठा मिळवून देत असलेल्या ऑस्कर स्पर्धेत आपण अजून ‘पडद्याबाहेरच ‘……