अभिनेता हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘काबिल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हृतिकचा कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकला नव्हता त्यामुळे आता या चित्रपटाकडून सर्वांनाच फार अपेक्षा लागून राहिल्या आहेत. चित्रपटाची सुरुवात आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हृतिक-यामीची ही ‘काबिल’ कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे असेच चित्र सध्या दिसत आहे.

संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटामध्ये यामी आणि हृतिक पडद्यावर अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल आणि एकंदर चित्रपटाबद्दल प्रेक्षक, समीक्षकांनीही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काबिल’ हा चित्रपट हृतिक रोशनला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणणारा ठरु शकणार आहे. हृतिकप्रमाणेच यामी गौमसाठी सुद्धा या चित्रपटाचे फार महत्त्व आहे. ‘विकी डोनर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या यामी गौतमच्या करियरला हा चित्रपट कलाटणी देऊ शकतो हे नाकारता येणार नाही. ‘काबिल’मुळे मिळणारी प्रशंसा पाहता यामीने नुकतेच सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत हृतिक रोशन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. अत्यंत भावूक शब्दांतून व्यक्त होत यामीने हा संदेश लिहिला आहे.

‘कुठून सुरुवात करु हेच कळत नाही आहे. मी राकेशजींचे सर्वात आधी आभार मानू कि हृतिकचे हेच कळत नाहीये. हृतिक तू एक खूप चांगला सहकलाकार आहेस’, असे म्हणत यामीने ‘काबिल’ चित्रपटाच्या टीममधील प्रत्येकाचे नावानिशी आभार मानले आहेत. चित्रपटासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक विभागाचे यामीने मनापासून आभार मानले आहेत. यामीने तिच्या ट्विटरद्वारे आभाराची ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरुन कलाकार हल्लीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे कलाविश्व, कलाकार आणि चाहत्यांना जोडणारा एक दुवा म्हणून सोशल मीडिया एक चांगलंच माध्यम ठरत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.