भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. विराटचे चाहते जगभरात आहेत. मात्र विराटला बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने क्लीन बोल्ड केलं. विराटने अनुष्काशी लग्नगाठ बांधली. पण विराटच्या आयुष्यात अनुष्का येण्याआधी बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्री होत्या. त्यापैकी एक म्हणजे ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया. २०१२ मध्ये तमन्ना आणि विराट एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्या चर्चांवर आता बऱ्याच वर्षांनी तमन्नाने मौन सोडलं आहे.

२०१२ मध्ये एका मोबाइलच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि तमन्नाची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. इतकंच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत तमन्नानं पदार्पण केलं त्यावेळी विराटची गर्लफ्रेंड म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अवघ्या काही महिन्यांतच दोघांचं ब्रेकअप झालं. ब्राझिलिअन मॉडेल इजाबेलमुळे हे ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी झालेल्या कोणत्याच चर्चांवर विराट आणि तमन्ना प्रसारमाध्यमांसमोर कधीच व्यक्त झाले नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने विराटसोबत काम केल्याचा अनुभव कसा होता त्याबद्दल सांगितले.

वाचा : ‘तुला पाहते रे’मध्ये राजनंदिनीची एण्ट्री कधी होणार?; शिल्पा तुळस्कर म्हणते.. 

‘आम्ही दोघं २०१२ मध्ये एका शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण त्यानंतर पुन्हा कधीच आमची भेट झाली नाही. फार काही आम्ही बोललो पण नाही. शूटिंगदरम्यान आम्ही क्वचित चार शब्द एकमेकांशी बोललो होतो. पण मी हे विश्वासाने सांगू शकते की ज्या अभिनेत्यांसोबत मी काम केलंय त्यापैकी विराट सर्वांत चांगला व्यक्ती आहे,’ असं तिने सांगितलं.

अनुष्का आणि विराटची पहिली भेटसुद्धा एका जाहिरातीदरम्यान झाली होती आणि तिथूनच पुढे मैत्री वाढत गेली. काही वर्ष डेट केल्यानंतर विराट २०१७ मध्ये अनुष्कासोबत लग्नबंधनात अडकला.