बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे ४ वर्षांनी आमिर खान हा मोठ्या पडद्यावर झळकला. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल असे म्हटले जात होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. या चित्रपटाने १०० कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने देशभरात म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही. या चित्रपटादरम्यान आमिर खानने अनेक वक्तव्य केले होती. त्यानंतर आता त्याने सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे.
आज १ सप्टेंबर रोजी जैन धर्मातील अनेक लोक हे ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणत एकमेकांची क्षमा मागतात. जैन धर्मात पर्युषण पर्व असते. या काळात आत्मशुद्धीसाठी हे क्षमायाचना पर्व केले जाते. यात हात जोडून प्रत्येकजण एकमेकांची क्षमा मागतात. यालाच ‘मिच्छामी दुक्कडम्’ असे म्हणतात. याच पर्वाचे निमित्त साधत आमिर खानने एक ट्वीट केले आहे.
आणखी वाचा : “विनाश हा…” ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर अतुल कुलकर्णींचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
यात आमिर खान एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सुरुवात ‘मिच्छामी दुक्कडम्’ याने होते. त्यापुढे आमिर खान म्हणाला, “आपण सर्व मानव आहोत आणि चुका या मानवाकडूनच होतात. कधी शब्दातून, कधी कृतीतून, कधी नकळत तर कधी रागात. कधी विनादातून, कधीही न बोलून आपल्याकडून चुका होता. जर माझ्यामुळे तुमचे कोणाचेही हृदय कोणत्याही प्रकारे दुखावले गेले असेल तर मी मनाने, शब्दाने, शरीराने माफी मागतो. मिच्छमी दुक्कडम.”
आणखी वाचा : …अन् आमिर खानने दिलं नागराज मंजुळेंना स्क्रिनिंगला येण्याचे आमंत्रण, वाचा नेमकं काय घडलं?
दरम्यान बॉक्स ऑफिसवर नुकसान झाल्यानंतर ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांना ओटीटी डीलमध्येही नुकसान झालं. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत सुमारे १५० कोटींचा करार केला आहे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरताच हा करारही तुटला. नवीन माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा यांचे डिजीटल अधिकार आता ५० कोटींना विकले गेले आहेत.