काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत होते. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, आता आमिरचा भाऊ फैजल खानने आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.

फैजलने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. ‘माझं स्वत: चं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही, तर कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारा मी कोण आहे. त्यांच्यासाठी काय चांगले आहे ते त्यांना माहित आहे,’ असे फैजल आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटावर म्हणाला.

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

फैजलला प्रश्न विचारण्यात आला की, ‘अशा अफवा आहेत की आमिर दुसऱ्या कोणावर प्रेम करतो आणि लवकरच तो लग्न करणार आहे. यावर तुम्हाला आमिरला कोणता सल्ला द्यायचा आहे का?’ या प्रश्नावर फैजल म्हणाला, ‘मी त्यांना सल्ला देऊ शकत नाही. माझं वैवाहिक जीवन टिकू शकलं नाही.’

आणखी वाचा : बिग बॉस ओटीटीच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

दरम्यान, विभक्त झाल्यानंतर आमिर आणि किरण रावने एक स्टेटमेंट शेअर केलं होतं. “१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू,” असं आमिर आणि किरण या स्टेटमेंटमध्ये म्हणाले आहेत.