ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर लिखित, पन्नास वर्षांपूर्वीचे वादग्रस्त ठरलेले ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी बोलताना, ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पन्नास वर्षांपूर्वीचे असले तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे.

मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेवर आणि देवावर श्रद्धा असणाऱ्या लक्ष्मीचे, लग्नसंस्थेच्या पूर्ण विरोधात असलेल्या सखारामसोबतचे नाते कसे जुळते, हे नाटकातून पाहायला मिळेल, असे नेहा जोशी यांनी सांगितले. सुमुख चित्र निर्मित, या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. नाटकाचे दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केले आहे.

संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमित पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. संकेत गुरव यांनी साहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. ‘विजय तेंडुलकरांसारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या संहितेला धक्का लावणं योग्य नाही, त्यामुळे मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सयाजी शिंदे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारासोबत काम करण्यापूर्वी सुरुवातीला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा ते एखादी भूमिका करतात, तेव्हा ते केवळ एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर येतात. त्यांच्या अभिनयात इतके समरस होतात की त्यांचे मोठेपण आणि नावाचा लौकिक आपोआप बाजूला सारला जातो. त्यांच्यासोबत काम करताना कलेप्रति असलेली त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जवळून अनुभवता आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं’, असेही नेहा यांनी सांगितले.