युवा रंगकर्मी आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकले आहे. ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत फॅशन, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, चित्रपट, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी आश्वासक ३० युवक-युवतींना या विशेष यादीमध्ये स्थान दिले असून त्यामध्ये पुण्याच्या आलोकचा समावेश आहे.

खास युवकांसाठी असलेल्या या फोब्र्जच्या यादीमध्ये माझा समावेश झाल्याबद्दल निश्चितच आनंदाची भावना असल्याचे आलोक राजवाडे याने सांगितले. नाटक ही समूह कला आहे. यामध्ये कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ असे सारे आपापला वेळ घालवून ती समूह कला सादर करीत असतात. अर्थात यामध्ये आमची कला पाहण्यासाठी आपला वेळ देणारे प्रेक्षकही अंतर्भूत आहेत. त्यामुळे या समूह कलेमध्ये काम करणाऱ्या माझी दखल घेतली गेली ही सन्मानाची बाब आहे. अर्थात हा सन्मान माझ्या एकटय़ाचा नाही तर, ‘समन्वय’, ‘आसक्त’ आणि ‘नाटक कंपनी’ या संस्थांच्या माध्यमातून मी ज्या कलाकारांसमवेत काम केले त्या सर्वाचा या यशामध्ये तेवढाच महत्त्वाचा आणि मोलाचा सहभाग आहे, असेही आलोक याने कृतज्ञतापूर्वक सांगितले. गेल्या वर्षी निपुण धर्माधिकारी याला हा बहुमान मिळाला होता. त्यानंतर आता माझी निवड झाली याचा आनंद झाला असल्याचे त्याने सांगितले.

अक्षरनंदन शाळेत शिकत असताना आलोक याने ‘जागर’ संस्थेच्या ‘अब्राहम लिंकनचे पत्र’ या नाटकातून रंगमंचावर सर्वप्रथम काम केले. ‘बीएमसीसी’मध्ये असताना पुरुषोत्तम करंडकसह सर्व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग घेणारा आलोक हा आसक्त आणि समन्वय या संस्थांसमवेत काम करीत असे. अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, पर्ण पेठे, सिद्धार्थ मेनन, ओम भूतकर, अभय महाजन, सायली फाटक आणि गंधार संगोराम अशा नाटकामुळे एकत्र आलेल्या मित्रांनी नाटक कंपनी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ‘गेली २१ वर्षे’, ‘बिनकामाचे संवाद’, ‘शिवचरित्र आणि एक’, ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकांचे आलोकने दिग्दर्शन केले असून ‘आषाढातील एक दिवस’, ‘बेड के नीचे रहनेवाली’ आणि ‘दळण’ या नाटकांतून अभिनय केला आहे.