प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ‘काश्मीर फाइल्स’वर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरींनीच टीका केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती यावर आपली भावना व्यक्त केली. “माझी पहिली प्रतिक्रिया काय होती हे मी टीव्हीवर सांगू शकत नाही. माझी प्रतिक्रिया हिंसक होती,” असं अनुपम खेर यांनी सांगितलं. तसेच १९९० मध्ये काय घडलं होतं याच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते शनिवारी (३ डिसेंबर) एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.

अनुपम खेर म्हणाले, “काश्मीर फाइल्सवर टीकेनंतर माझी पहिली प्रतिक्रिया काय होती हे मी टीव्हीवर सांगू शकत नाही. माझी प्रतिक्रिया हिंसक होती. माझ्या मनात आलं होतं की एक कानाखाली मारावी. कारण ही केवळ माझा गोष्ट नाही, तर पाच लाख लोकांची गोष्ट आहे ज्यांना १९९० साली त्यांच्या घरातून हिंसकपणे काढून देण्यात आलं होतं.”

“आमच्या अनेक माता-भगिनींवर बलात्कार झाले”

“घरातून काढून देण्याआधी अनेक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. आमच्या अनेक माता-भगिनींवर बलात्कार करण्यात आले होते आणि ३२ वर्षे या गोष्टीला लपवून ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही सरकारने, कोणत्याही पक्षाने, पत्रकाराने हे मान्य केलं नाही. ही घटना झाली नाही असं म्हणणं हा खरंतर प्रपोगंडा होता,” असा आरोप अनुपम खेर यांनी केला.

हेही वाचा : IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्वोच्च न्यायालयाकडूनही सुनावणीस नकार”

“सर्वोच्च न्यायालयानेही ही खूप जुनी गोष्ट आहे असं म्हणत पुन्हा ती कशाला उकरायची म्हणून सुनावणीस नकार दिला होता. खूप अडचणींनंतर विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट बनवला आणि हे दुःख जगापर्यंत पोहचलं. त्यानंतर संपूर्ण जगात याचा उल्लेख व्हायला लागला,” असंही खेर यांनी म्हटलं.