१९८७-१९८८ च्या काळात छोट्या पडद्यावरील रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. आजही या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षात अशा अनेक पौराणिक मालिका आल्या. पण रामानंद सागर यांनी तयार केलेलं ‘रामायण’ आजतागायत कोणी विसरू शकलेले नाही. ‘रामायण’चा रिमेक करण्याबद्दल अनेकदा चर्चाही झाल्या आहेत.

अशातच ‘रामायण’ या महाकाव्याचे रिमेक करण्यावर प्रभू श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अरुण यांनी सांगितले की, सध्याचा कोणता अभिनेता भगवान रामची भूमिका साकारू शकतो. अरुण गोविल म्हणाले, “तीन-चार लोकांनी रामाची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना यश आले नाही.”

यानंतर ते म्हणाले, “मला वाटत नाही की, आपल्या आयुष्यात कोणीही रामायणाचा रिमेक करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा रामाची भूमिका साकारण्याचा विचार येतो तेव्हा माझ्या मते, आपल्याकडील आताचा कोणताच कलाकार या भूमिकेसाठी योग्य नाही. कदाचित या इंडस्ट्रीबाहेरील कोणीतरी योग्य पर्याय असेल.” अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या वेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अरुण गोविल यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जिथे नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. ‘रामायण’ हा दोन भागांचा चित्रपट आहे. यातील पहिला भाग २०२६ मधील दिवाळीमध्ये आणि एक भाग पुढच्या वर्षी २०२७ प्रदर्शित होईल. या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता असतानाच अरुण गोविल यांनी व्यंग्यात्मक वक्तव्य केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे. याआधी रणबीर कपूर रामाची भूमिका साकारण्याबद्दल त्यांना विचारले होते. तेव्हा त्यांनी मोजक्या शब्दांत “येणारा काळच याबद्दल नेमके उत्तर देईल. तो एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे तो साकारत असलेल्या भूमिकेबद्दल आता काहीही बोलणे योग्य नाही” अशी प्रतिक्रिया दिली होती.