भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ या बंगल्याबाहेरील रॅम्प हटविण्याची मागणी केली आहे. येथील स्थानिक लोकांच्या तक्रारीची दखल घेत पूनम महाजन यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे ‘मन्नत’च्या बाहेरील रॅम्प काढून टाकण्याची मागणी केली. वांद्रे येथील शाहरूखचा ‘मन्नत’ हा बंगला चित्रपटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. या बंगल्याबाहेर असणाऱ्या सिमेंटच्या रॅम्पचा वापर शाहरूखची व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यासाठी करण्यात येतो. मात्र, या रॅम्पमुळे या ठिकाणचा रस्ता अरूंद झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे हा रॅम्प हटविण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होती. सप्टेंबरच्या काळात येथे भरणाऱ्या माऊंट मेरी जत्रेदरम्यान या रॅम्पमुळे मोठी गैरसोय होत असल्याचेही येथील लोकांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणात पूनम महाजन यांनी लक्ष घातल्यामुळे या संपूर्ण प्रकरणात लवकर न्याय मिळेल, अशी स्थानकांची आशा आहे.