‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात झळकलेल्या अभिषेक कुमारने त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मुंबईत नवीन असताना त्याच्याबरोबर एका व्यक्तीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने याबाबत खुलासा केला आहे.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिषेक म्हणाला, कास्टिंग काऊचचा प्रसंग घडल्यानंतर त्याला खूप त्रास झाला होता. याबद्दल सांगताना तो म्हणाला, “माझ्याबरोबर एक धक्कादायक घटना घडली होती. मुंबईत नवीन असताना इथे येऊन मला दीड-दोन महिनेच झाले होते. माझ्याबरोबर एका गे मुलाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मला सांगितलं की पुढे जायचं असेल तर तुला हे करावं लागेल वगैरे. तेव्हा मला खूप भीती वाटली होती आणि तेव्हा मी माझ्या घरी मुंबईत नाही तर ट्रेनिंगसाठी दिल्लीत राहत असल्याचं सांगितलं होतं. पण, मी आईला फोन करून सांगितलं की माझ्याबरोबर असं झालं आहे. मी रडत रडत याबद्दल आईला सांगितलं तेव्हा तिने मला तू पुन्हा घरी निघून ये असं सांगितलं.”
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना अभिषेक पुढे म्हणाला, “आईने मला यायला सांगितल्यानंतर मी ट्रेनचे तिकीट काढले आणि जनरल डब्यात बसून रडत रडत घरी गेलो. तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की, मला या इंडस्ट्रीत राहायचं नाहीये, इथे राहणं खूप अवघड आहे.”
दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते ‘बिग बॉस’मुळे. यामध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता; तर ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनचा तो उपविजेता ठरला होता. ‘बिग बॉस’मध्ये त्याचे त्याची एक्स गर्लफ्रेंड इशा मालवीयसह अनेकदा वाद झाले, तर तो संपूर्ण सीझन चर्चेत होता. ‘बिग बॉस’मध्ये झळकण्याआधी त्याने ‘उदारियान’ आणि ‘बेकाबू’ यांसारख्या कलाकृतींमध्ये काम केलं होतं.