संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील मोठं नाव. अवाढव्य खर्च, मोठा सेट आणि तगडी स्टारकास्ट हे जणू संजय लीला भन्साळी यांच्याबाबतचं समीकरण झालं आहे. आजवर त्यांनी विविध विषयांवर आधारीत चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे अनेकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. एकदा तरी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं.

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये झळकण्याची अनेकांची इच्छा असली किंवा त्यांच्या कामाचं जरी कौतुक होत असलं तरी नाण्याची दुसरी बाजू असते, तसंच संजय लीली भन्साळी यांच्या तापट स्वभावाबद्दलही अनेकांनी यापूर्वी तक्रारी केल्या आहेत. अशातच अभिनेता सूरज पांचोलीने नुकतंच ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केलं आहे. सूरजने हृतिक रोशन व ऐश्वर्या राय यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गुजारिश’ चित्रपटाच्यावेळी संजय लीला भन्साळी यांच्यासह असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला संजय लीला भन्साळी यांच्यासह काम करण्याच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं होतं. यावेळी प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “मला प्रचंड ओरडा पडायचा; त्यावेळी इतरांच्या तुलनेत मीच सगळ्यात जास्त ओरडा खात असे. खूपदा त्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी माझं काम असं होतं की, हृतिक रोशन ज्या खुर्चीवर बसायचे त्यावर मला लाईटच्या व्यवस्थेसाठी बसावं लागत असे आणि तेव्हा थोडं जरी डाव्या किंवा उजव्या बाजूला मान हलवली तरी संजय सर असेल ती वस्तू फेकून मारायचे.”

संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल बोलताना सूरज पुढे म्हणाला, “आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि ते चौथ्या मजल्यावर राहतात.” यानंतर “तू कधी त्यांच्याकडे काम मागितलं आहेस का?” असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी तेव्हाच त्यांच्याकडे काम मागेन, जेव्हा मला माझ्या पात्रतेचं काम मिळणार असेल. छोट्या भूमिकांसाठी मी त्यांच्याकडे काम नाही मागणार. जेव्हा मला वाटेल की आता मी स्थिरावलो आहे किंवा मी काहीतरी कमावलं आहे, तेव्हाच मी त्यांच्याकडे काम मागण्यासाठी जाईन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय लीला भन्साळी यांच्या तापट स्वभावाची तक्रार यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरनेही केली होती. २०२१ साली एका कार्यक्रमात रणबीर कपूर म्हणाला होता, “‘ब्लॅक’ चित्रपटासाठी जेव्हा मी संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं, तेव्हा ते माझ्याप्रती खूप आक्रमक होते. त्यांनी मला कधीच नीट वागणूक दिली नाही.” एवढंच काय, तर रणबीर कपूरने नेहा धुपियाला तो पुन्हा कधीच संजय लीली भन्साळी यांच्याबरोबर काम करणार नाही असं सांगितलं होतं. परंतु, नंतर त्यांच्यातील वाद मिटले आणि आता ते ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.