बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही पुन्हा बॉलिवूडमध्ये चांगलीच रुळली आहे. माधुरी टेलिव्हिजनपासून ओटीटीपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत असते. याबरोबरच ती इतर तरुण कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नुकताच प्राइम व्हिडिओवर माधुरीचा ‘मजा मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचा विषय चांगलाच बोल्ड आहे आणि माधुरीच्या अभिनयाचीही लोकांनी प्रशंसा केली आहे.

खूप वर्षांनी माधुरी पुन्हा मनोरंजनविश्वात परतली आहे. आपल्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असताना माधुरीने लग्न करून चित्रपटक्षेत्राला रामराम ठोकल्याने तिचे बरेच चाहते नाराज झाले होते. त्याचविषयी माधुरीने एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. लग्न झाल्यानंतर माधुरीला नृत्य आणि अभिनय सोडायचा सल्लादेखील दिला गेला होता. याविषयीच खुद्द माधुरीने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : २०२३ च्या ईदला सलमान करणार नाही त्याच्या चाहत्यांना निराश, या चित्रपटाबद्दल केली मोठी घोषणा

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरीने यावर भाष्य केलं आहे. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर लोकांचा तिच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला असं माधुरीचं म्हणणं आहे. त्यावेळेस लोक तिच्याशी कसे बोलायचे याबद्दल माधुरीने सांगितलं की, “तू आता आई झाली आहेस, आता तुला नृत्याची किंवा अभिनय करायची काहीच गरज नाही. तू आता फक्त तुझ्या घराकडे लक्ष दे, मुलांची काळजी घे, पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री ही या गोष्टी कायम करतच असते.”

एवढंच नाही तर लोक गृहीणींना खूप गृहीत धरतात असंही माधुरीने यामध्ये नमूद केलं आहे. माधुरीने आई झाल्यानंतर काही काळ या क्षेत्रातून ब्रेक घेतला पण नंतर तिने जोरदार कमबॅक करत स्त्रियांना गृहीत धरणाऱ्या मानसिकेतला उत्तर दिलं आहे. माधुरीच्या ‘मजा मा’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. यामध्ये माधुरीचं पात्र हे समलिंगी दाखवलं असल्याने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबरोबरच माधुरी संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजमध्येही झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.