Anil Kapoor 67th Birthday: “इक रास्ता है ज़िन्दगी जो थम गए तो कुछ नहीं, ये क़दम किसी मुक़ाम पे जो थम गए तो कुछ नहीं!” प्रसिद्ध गीतकार साहिर लुधीयानवी यांनी लिहिलेल्या या गीताप्रमाणेच आयुष्यात कधीही कुठेही न थांबण्याचा दृढनिश्चय केलेल्या बॉलिवूडचा ‘झकास’ अभिनेता अर्थात अनिल कपूर हे आज त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील चिरतरुण अभिनेता म्हणून देव आनंद यांना ओळखलं जातं. देव आनंद यांच्यानंतर ही गोष्ट खरी करून दाखवली आहे ती अनिल कपूर यांनी. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मधील बापाची भूमिका असो किंवा आदित्य रॉय कपूरच्या ‘नाईट मॅनेजर’मधील एका देखण्या आणि तितक्याच क्रूर व्हिलनची भूमिका असो, या दोन्ही ठिकाणी अनिल कपूर यांचा उत्साह आणि ऊर्जा ही आजच्या तरुण कलाकारांवरही भारी पडते ही गोष्ट आज आपल्याला मान्य करायलाच लागेल. अर्थात चिरतरुण या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन अनिल कपूर यांनी सशक्त अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे हे वेगळं सांगायची काहीच आवश्यकता नाही कारण गेली ४० वर्षं ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आज याच ‘झकास’ अभिनेत्याबद्दल काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

२४ डिसेंबर १९५६ साली सुरेंदर कपूर या निर्मात्याच्या घरी मुंबईतील चेंबुरच्या टिळक नगर परिसरात लहानग्या अनिल कपूरचा जन्म झाला. भाऊ बोनी कपूरसह अनिल कपूर लहानाचा मोठा चेंबुरमध्येच झाला, अन् मग धाकट्या संजय कपूरचीही घरात एंट्री झाली. आजही या कपूर त्रिकुटासाठी त्यांचा चेंबुरचा परिसर प्रचंड प्रिय आहे, कारण या तिघांनी वयाची फार महत्त्वाची वर्षं या शहरात घालवली आहेत. त्यामुळे आजही अनिल कपूर किंवा बोनी कपूर आज जुहूसारख्या उच्चभ्रू परिसरात जरी राहत असले तरी त्यांच्या मनात चेंबुरसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे. त्याकाळी सुरेंदर कपूर हे चित्रपटसृष्टीच्या ओढीने मुंबईत आले खरे पण काहीच दिवसांत त्यांना आर्थिक चणचण भासू लागली. पाच-सहा लोकांचं कुटुंब पोसण्यासाठी त्यांना कुठेतरी राहायला जागा मिळणं फार आवश्यक होतं. ते कामासाठी धडपड करतच होते. अशातच त्यांनी आपले चुलत बंधु राज कपूर यांच्याकडे मदतीचा हात मागितला, पण स्वाभिमानी अशा सुरेंदर यांनी कोणतीही आर्थिक मदत न मागता त्यांच्याकडे राहण्यासाठी आश्रय मागितला अन् पुढील काही वर्षं त्यांचं संपूर्ण कुटुंब राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहत होतं.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

हळूहळू त्यांना काम मिळालं, सह निर्माता म्हणून पहिल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली नसली तरी पैसे मिळाले अन् मग सुरेंदर आपल्या कुटुंबासह चेंबुरच्या चाळीत राहायला आले. दरम्यान आपले वडील अन् भावाकडे पहात मोठ्या होणाऱ्या अनिल कपूर यांनीही याच क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करायचा निर्णय घेतला. घरात तशी अनुकूल परिस्थिती असूनही अनिल कपूर यांना वडील व भावाची मदत न घेता या क्षेत्रात नाव कमवायचं होतं. वडिलांप्रमाणेच स्वावलंबी विचाराने झपाटलेल्या अनिल कपूर यांनी पुण्याच्या ‘फिल्म इंस्टीट्यूट’ची प्रवेश परीक्षा दिली, पण पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या पदरी अपयश पडलं. हे अपयश त्यांना पचनी पडलं नाही. आपल्या वडील आणि भावाचं नाव आपण पुढे नेऊ शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले अन् त्यांनी अभिनयाला रामराम ठोकायचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना त्यांची बालपणीची एक गोष्ट आठवली.

ती गोष्ट म्हणजे, अनिल कपूर यांनी पूर्वी एका चित्रपटात बाराव्या वर्षी बालकलाकार म्हणून काम केले होते, त्यांचं चित्रीकरणही पूर्ण झालं होतं, पण निर्मात्यांच्या काही आर्थिक अडचणीमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. या चित्रपटात काम करणारे इतके कलाकार तो प्रदर्शित न होतासुद्धा झटत आहेत, तर एका परीक्षेत आलेलं अपयश आपल्याला पचवता आलं पाहिजे हा विचार अनिल कपूर यांच्या मनात आला अन् मग तिथून त्यांनी पुन्हा मागे वळून पाहायचं नाही अशी खूणगाठच बांधली. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून अनिल कपूर यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पुढे ‘मशाल’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परींदा’, ‘बेटा’, ‘विरासत’सारख्या चित्रपटातून केवळ आणि केवळ अभिनयाच्या जोरावर अनिल कपूर यांनी स्वतःला सिद्ध केलं. एकेकाळी ‘फिल्म इंस्टीट्यूट’च्या परीक्षेत नापास झालेल्या, ऑडिशनसाठी पायपीट करणाऱ्या या तरुणाच्या अभिनयाची दखल क्रिटीक लोकांनीही घ्यायला सुरुवात केली. दरम्यान अनिल कपूर यांची ओळख सुनीता भवनानी यांच्याशी झाली अन् आधी मैत्री व नंतर प्रेम असं त्यांचं नातं बहरत गेलं अन् १९८४ साली ते दोघे विवाहबद्ध झाले.

फिल्मी करिअर आणि संसार यांची गाडी उत्तम धावत असताना अनिल कपूर यांचं नाव गॉसिपमध्ये आलं नाही असं शक्य नाही. बोनी कपूर यांच्यासह झालेले कौटुंबिक कलह, दाऊदची भेट यामुळे अनिल कपूर कायम चर्चेत असायचे. अगदी कीमी काटकरपासून माधुरी दीक्षितपर्यंत कित्येक अभिनेत्रींबरोबर अनिल कपूर यांचं नाव जोडलं गेलं, अगदी आजही या विषयावर लोक प्रचंड चर्चा करतात. अर्थात त्यावेळी हे गॉसिप चांगलंच चर्चेत होतं, इतकं की सुनीता या आपल्या मुलांसह अनिल कपूर यांच्या चित्रपटाच्या सेटवर यायच्या. प्रत्यक्षात कोणताही वाद झाला नसला तरी या कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडू नये यासाठी माधुरी दीक्षितनेच नंतर अनिल कपूर यांच्यासह काम न करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १८ वर्षांनी म्हणजेच २०१९ साली आलेल्या ‘टोटल धमाल’मध्ये लोकांना त्यांची ही लोकप्रिय जोडी पुन्हा स्क्रीनवर पाहायला मिळाली.

anil-kapoor-madhuri-dixit
फोटो : सोशल मीडिया

या सगळ्याचा मात्र आपल्या फिल्मी करिअरवर अनिल कपूर यांनी फरक पडू दिला नाही. विविधांगी भूमिकांनी समृद्ध अशी त्यांची कारकीर्द अजूनही अव्याहत सुरूच आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडलाही त्यांची दखल घ्यावी लागली. आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच सीरिजमध्येदेखील अनिल कपूर यांनी स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

वाढतं वय लक्षात घेत भूमिका स्वीकारणारे फार कमी नट आपल्याला पाहायला मिळतात अन् अनिल कपूर हे त्यापैकी एक नाव आहे. यामुळेच कदाचित त्यांनी ‘ताल’, ‘पुकार’, ‘हम आपके दिल में रहते है’सारखे चित्रपट स्वीकारले अन् लोकांना दाखवून दिलं की चित्रपटाचा नायक होण्यासाठी कायम तरुण दिसायची गरज नाही. तारुण्य हे तुमच्या कामातून आणि अभिनयातून दिसायला हवं. हीच गोष्ट अनिल कपूर यांनी पाळली अन् यामुळेच आजही मीडियासमोर कितीही मोठा तरुण सुपरस्टारसमोर अनिल कपूर आले की आपसूक लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळतात. अगदी शाहरुख खानपासू वरुण धवन, रणबीर कपूर पर्यंत कलाकारांचा चार्म एकीकडे अन् अनिल कपूर यांचं चिरतारुण्य एकीकडे हे अगदी कुणीही मान्य करेल. ‘तेजाब’मधला महेश देशमुख असो, ‘विरासत’मधला शक्ति ठाकूर असो, ‘रेस’ सीरिजमधला चावट पोलिस ऑफिसअर असो किंवा ‘वेलकम’मधला मजनू भाई अनिल कपूर यांच्या प्रत्येक भूमिकेत तुम्हाला एक फ्रेशनेस जाणवतो जो आजच्या कित्येक तरुण कलाकारांच्या बाबतीत अजिबात जाणवत नाही. फिटनेस फ्रिक, चिरतरुण अन् ‘माय नेम ईज लखन’ची सिग्नेचर स्टेप पुढील कित्येक पिढ्यांना शिकवणारा बॉलिवूडचा हा एव्हरग्रीन अभिनेता ९० व्या वाढदिवशीदेखील असाच तरुण दिसेल ही गोष्ट आता प्रेक्षकांनीही मान्य केली आहे. अशा या ‘झकास’ अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.