अभिनेता गोविंदा व सुनीता आहुजा यांच्या लग्नाला जवळपास ३८ वर्षे झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनीता यांना गोविंदा व त्यांच्या नात्याबद्दलची एक चांगली गोष्ट काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सुनीता यांनी रिलेशनशिपमध्ये त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तीन गोष्टींबद्दल सांगितलं आणि त्यांनी शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटातील भूमिकेबरोबर स्वत:ची तुलना केली.
‘डर’ चित्रपटामध्ये शाहरुखने एका गंभीर मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती, जो त्याच्या प्रिय स्त्रीबरोबर राहण्यासाठी लोकांना मारतो, तिच्याबाबत खूप पझेसिव्ह असतो. यामध्ये शाहरुखसह जुही चावला झळकली होती. ‘इन्स्टेंट बॉलीवूड’सह संवाद साधताना सुनीता यांना लग्नाच्या ३८ वर्षांनंतरही ते दोघे त्यांचं नातं जपण्यासाठी काय करतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, “प्रेम, विश्वास आणि मुलं. प्रेमामध्ये विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं आणि मला आमच्या प्रेमावर विश्वास आहे. मी शाहरुख खानने ‘डर’ चित्रपटात जशी भूमिका साकारली होती, तो जसा प्रेम करायचा तसं प्रेम करते. माझी तशी पद्धत आहे. मी सुद्धा खूप पझेसिव्ह आहे. मी माझी मुलं व नवऱ्याबद्दल खूप पझेसिव्ह आहे. नात्यामध्ये पझेसिव्ह असणं गरजेचं असतं”.
मुलाखतीमध्ये सुनीता यांनी त्यांच्या आईने त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, त्यांच्या आईला त्यांनी एक गृहिणी व्हावं असं वाटायचं, तर त्या अभिनयक्षेत्राबद्दलच्या नकारात्मक गोष्टी सांगत सुनीता यांना अभिनेत्री न होण्याचा सल्ला द्यायच्या. सुनीता म्हणाल्या, “माझ्या आईला मी गृहिणी व्हावं असं वाटायचं, कारण तीसुद्धा गृहिणीच होती. तिने गोविंदावर खूप प्रेम केलं. मी लग्न करावं, मुलांना जन्म द्यावा अशी तिची इच्छा होती. ती मला म्हणायची अभिनेत्री होऊन तू काय करणार आहेस, त्यामुळे मी तिचं ऐकलं आणि आता या गोष्टीला ३८ वर्षे झाली आहेत.”
दरम्यान, गोविंदा व सुनीता यांच्या घटस्फोटाबद्दल काही दिवसांपूर्वी चर्चा सुरू होत्या, पण सुनीता यांनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं. गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सुनीता यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीता यांनी सांगितलं होतं की, त्या आणि गोविंदा वेगवेगळे राहतात. यामुळेसुद्धा त्यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा व्हायला सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.