हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील सरदार खान अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

नुकतंच मनोज बाजपेयी यांनी ‘लल्लनटॉप’ या मीडिया पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मनोज यांनी धमाल गप्पा मारल्या. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे त्यांचे बरेच अनुभव त्यांनी शेअर केले. त्यापैकी ‘शूल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा रवीना टंडनचा एक किस्सा मनोज यांनी सांगितला. बिहारच्या ‘बेतिया’ गावात तेव्हा शूलचं चित्रीकरण सुरू असताना रवीनाला प्रचंड सुरक्षा देण्यात आली असल्याचं मनोज यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा : मराठमोळी वेब क्वीन मिथीला पालकरचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत; चाहते म्हणाले “साऊथच्या चित्रपटात काम कर”

त्यावेळी बिहारच्या पोलिसांनी भरपूर बंदोबस्त केला होता. याबद्दल बोलताना मनोज म्हणाले, “हजारो लोक कलाकारांना बघण्यासाठी तेव्हा गर्दी करायचे, त्यांना अडवण्यासाठी पोलिस बंदोबस्त होता, खासकरून रवीना टंडनसाठी लोक खूप उत्सुक होते. त्यावेळी ती एक सुपरस्टार होती. त्या गर्दीत रवीनाला पाहायला माझे वडीलसुद्धा आले होते. या सगळ्या पोलिस बंदोबस्तात आम्ही चित्रीकरण केलं. त्यावेळी रवीनाच्या भोवताली ६ प्रकारचे सुरक्षा रक्षक असायचे. पहिले महिला पोलिसांचं वर्तुळ, नंतर काठ्या घेतलेले पोलिस, त्यानंतर रायफलधारी सुरक्षा रक्षक, नंतर बॉडीगार्ड अशी सुरक्षा रवीनासाठी होती.”

आणखी वाचा : राजेश खन्ना यांच्या एका निर्णयामुळे अमिताभ बच्चन बनले सुपरस्टार; नेमका किस्सा जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे मनोज म्हणाले, “त्यावेळी मी रवीनाची चौकशी करायला तिला विचारलं की सगळं ठीक आहे ना? काही त्रास नाही ना?” यावर रवीना म्हणाली, “मला या अशा सुरक्षेची अजिबात सवय नाही. मला इंदिरा गांधी असल्यासारखं वाटतंय.” मनोज आणि रवीना यांची मुख्य भूमिका असलेला ‘शूल’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटामुळे मनोज यांना ओळख मिळायला सुरुवात झाली. राम गोपाल वर्मा यांनी याची निर्मिती केली होती.