बॉलिवूड गायक मिका सिंग आणि राखी सावंत यांच्यातील २००६ मध्ये झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राखी सावंतने दाखल केलेली विनयभंगाची तक्रार रद्द करण्यासाठी गायक मिका सिंगने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला आता १७ वर्षे जुने प्रकरण रद्द करायचे आहे. मिकाने बळजबरीने किस केल्याचा आरोप राखीने केला होता.
मिकाच्या वकिलाचे म्हणणे आहे की गायकाने आणि राखीने हे प्रकरण सामंजस्याने मिटवले आहे, त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टातून रद्द व्हायला हवं. मिका सिंगने २००६ साली राखी सावंतला वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय सर्वांसमोर किस केले होते. न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी १० एप्रिल रोजी मिका सिंगचे वकील सुनावणीसाठी आले. राखी सावंतचे वकील आयुष पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, राखी तिच्या कामात व्यग्र आहे, मात्र दोघांनी वाद मिटवला आहे. त्यामुळे तिने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास हरकत नाही.
दुसरीकडे, राखीच्या वकिलांनीही न्यायालयाला सांगितले की, एफआयआर रद्द करण्याच्या संमतीसंबंधीचे प्रतिज्ञापत्र आले होते, परंतु ते उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागात गायब झाले होते, त्यामुळे त्याचा शोध घेता आला नाही. त्यानंतर खंडपीठाने त्यांना पुढील आठवड्यापर्यंत नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, गायक मिका सिंगच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट यांनी न्यायालयासमोर सांगितले की, हे प्रकरण गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. मिका सिंगवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, मात्र आरोप निश्चित व्हायचे आहेत. मिका सिंग आणि राखी सावंत हे प्रकरण विसरले आहेत, त्यामुळे हे प्रकरण रद्द केले जावे.
नेमकं काय घडलं होतं?
२००६ मध्ये मिका सिंगने राखी सावंतला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या संमतीशिवाय किस केले होते. त्यानंतर राखी सावंतने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विनयभंगाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती.