दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) लवकरच ‘वनवास’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्यांनी माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) कौतुक केले. तसेच तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला.

एपिसोडमध्ये एका दर्शकाने नाना पाटेकर यांना माधुरी दीक्षितबरोबर ‘वजूद’मध्ये काम करण्याचा अनुभव विचारला. यावर उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, “तो खूप चांगला अनुभव होता. ती एक विलक्षण अभिनेत्री, सुंदर आणि एक अतिशय उत्तम डान्सर आहे. एका अभिनेत्रीमध्ये ज्या गोष्टी असायला हव्या, त्या सगळ्या तिच्यामध्ये आहेत. ती खूप चांगली व्यक्ती आहे, मला तिचं खूप कौतुक वाटतं.”

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

‘त्या’ गाजलेल्या कवितेबद्दल काय म्हणाले नाना पाटेकर?

यानंतर नाना पाटेकर यांना ‘कैसे बताऊं मैं तुम्हें’ या कवितेबद्दल विचारण्यात आलं. नाना यांनी चित्रपटात ही कविता माधुरीसाठी म्हटली होती. त्याबद्दल नाना पाटेकर म्हणाले, “ती कविता जावेद अख्तर साहेबांनी लिहिली होती आणि त्या चित्रपटाच्या ३०-३५ वर्षांनंतरही माधुरीमुळे ती कविता माझ्या आठवणींमध्ये आहे. मी ही कविता तिला वाचून दाखवली, त्यामुळे मला त्या आठवणी अजूनही आठवतात. त्या ओळी अजूनही माझ्या रक्तात वाहत आहेत असं मला वाटतं. जेव्हा कोणीही मला याबद्दल विचारतं तेव्हा त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात.”

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पाटेकर यांच्याबरोबर ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये उत्कर्ष शर्मा व सिमरत कौर हे कलाकारदेखील होते. तसेच त्यांच्याबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्माही होते. हॉटसीटवर बसल्यावर नाना पाटेकर यांनी अनेक रंजक किस्से सांगितले, आठवणी सांगितल्या आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तुम्हाला ‘वनवास’च्या टीमबरोबरचा हा एपिसोड आज (शुक्रवारी) रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर पाहता येईल.