‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी जादुई आकडा गाठत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी असूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने, काही दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ला १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश आले.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांमध्ये ११२.९९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळे देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला असून २०२३ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरला स्टोरी’ हा १०० कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत धर्मेंद्र यांचा खुलासा; म्हणाले, “त्या दोघांकडे पाहून…”

शाहरुख खानचा ‘पठाण’, रणबीरचा ‘तू झुठी में मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानंतर कोणताही नावाजलेला स्टार नसलेल्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने १४ दिवसांत १०० कोटींचा आकडा गाठला होता, परंतु ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांत ही कामगिरी केली आहे. ५ मे रोजी शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘द केरला स्टोरी’ने ८.०३ कोटींची कमाई केली होती. यानंतर हा आकडा कमी न होता वाढतच राहिला. प्रदर्शनाच्या एक आठवड्यानंतर शनिवारी १३ मे रोजी तब्बल १९.५० कोटींची कमाई करीत चित्रपटाचा १०० कोटींच्या यादीत समावेश झाला.

हेही वाचा : ‘मदर्स डे’निमित्त आर्या आंबेकरची खास पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द केरला स्टोरी’ला असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाची एकूण कमाई २०० कोटींहून अधिक होऊ शकते, अशी शक्यताही काही चित्रपट विश्लेषकांनी वर्तवली आहे. दरम्यान, या चित्रपटातून अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.