नव्वदच्या दशकातला हिरो नं. १ गोविंदा मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब राहिला आहे. तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे त्याने सिनेमांपासून ब्रेक घेत इतर गोष्टींवर लक्ष देण्याचे ठरवले. गोविंदा मोठ्या पडद्यावर दिसत नसला, तरी तो टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर अधूनमधून झळकत असतो. गोविंदाने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमधून काम केले आहे, मात्र दिलीप कुमार यांच्या सल्ल्याने त्याने काही चित्रपट सोडले होते. गोविंदाने आपल्या डान्सिंग स्टाईल आणि अभिनयावर प्रेक्षकांची मन जिंकली होती. नव्व्दच्या दशकात गोविंदाने खान मंडळींना टक्कर दिली होती. गोविंदानेदेखील चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी संघर्ष केला होता. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, "मी २१ वर्षाचा असताना ७५ चित्रपट स्वीकारले होते , तेव्हा दिलीप कुमार मला म्हणाले यातील २५ चित्रपट सोडून दे, मी त्यांना म्हणालो होतो मी या चित्रपटांचे आगाऊमध्ये पैसे घेतले आहेत. त्यावर ते म्हणाले देव तुला पैसे देईल विश्वास ठेव, त्यांचा सल्ला इतका अचूक होता की मी काम करत असताना सलग ४ ते ५ शिफ्टमध्ये काम करत होतो. मी आजारी पडलो, मला रुग्णालयात ठेवण्यात आले होते." अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली होती. गोविंदा मूळचा मुंबईचा, वर्तक कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या वडिलांच्या इच्छेखातर त्याने चित्रपटसृष्टीत करियर करण्यास सुरवात केली होती. तन बदन हा त्याचा पहिला चित्रपट ज्यात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर 'खुदगर्ज', 'दर्यादिल', 'घर घर की कहानी' यांसारख्या चित्रपटात काम केले. 'आवारगी', 'स्वर्ग' या चित्रपटांमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि त्याची जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती.