दुसऱ्या महायुद्धाचं नाव काढलं तरीही अनेकजण त्यामध्ये झालेलं नुकसान, जिवीत आणि वित्तहानी याविषयीच बोलतात. अर्थात ज्यांनी तो काळ अनुभवला नाही त्यांच्यासाठी हा विषय बराच आकर्षणाचा ठरतो. पण, तो तितकाच संवेदनशीलही असतो यात शंकाच नाही. ‘अस्मिता’ फेम अभिनेत्री मयुरी वाघलाही या दुसऱ्या महायुद्धाने काहीतरी देऊ केलंय. आता मयुरीचा आणि दुसऱ्या महायुद्धाचा संबंध काय, हाच प्रश्न तुमच्याही मनात घर करुन गेला असेल ना? मयुरीने स्वत:ला त्या काळाशी एका पुस्तकाच्या माध्यमातून जोडलं आहे. ते पुस्तक म्हणजे ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’. अॅन फ्रॅक या अवघ्या १२- १३ वर्षांच्या मुलीने त्या काळात तिने तोंड दिलेले प्रसंग या डायरीमध्ये लिहिले आहेत.

याविषयी सांगताना मयुरी म्हणाली, ‘मला माझ्या भावाने वाढदिवशी हे पुस्तक भेट दिलं होतं. मुळात या पुस्तकाच्या लेखिकेने तिच्या वयाच्या १२- १३ व्या वर्षातील प्रसंग आणि एकंदर मनातील घालमेल शब्दांत मांडली असल्यामुळे मीसुद्धा तिच्याशी स्वत:ला जोडू पाहात होते. हे वयच असं असतं की ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, भिती, मनावर असणारं दडपण, त्या मुलीची स्वप्नं या पुस्तकात मांडण्यात आली आहेत. मुळात अॅन ज्यू असल्यामुळे जर्मन आपल्याला पकडण्यासाठी येतोय की काय, याची भितीसुद्धा तिच्या शब्दांवाटे मांडली गेली आहे. माझ्या किताबखान्यातील हे सर्वात आवडीचं पुस्तक असून, ते मी कधीही वाचू शकते’, असं म्हणत मयुरीने या पुस्तकाविषयी असलेली तिची ओढ व्यक्त केली.

‘अनेकांना दुसरं महायुद्ध म्हटलं की बऱ्याच गोष्टी, नकारात्मकता समोर येते. पण, माझ्या बाबतीत तसं फार कमी झालं. कारण, अॅन फ्रँकच्या या डायरीशी मी जोडले गेले होते’, असं म्हणत या पुस्तकातील आपल्या किताबखान्यात असलेलं महत्त्व तिने स्पष्ट केलं. यापुढे आपल्या वाचनाच्या नेमक्या कलविषयी सांगताना मयुरी म्हणाली, ‘ऐतिहासिक, आणि पौराणिक किंवा त्या धर्तीवर आधारित पुस्तकं वाचण्याकडे माझा फार कल आहे. यामध्ये हिटलरचं ‘माइन काम्फ’, शिवाजी सावंत यांचं ‘मृत्युंजय’ या पुस्तकांचा समावेश आहे.’ वाचनाशी मयुरीचं एक वेगळच नातं असल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. ‘अस्मिता’ मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान, मयुरीने गुप्तहेरांची बरीच पुस्तकं वाचली. याशिवाय सिडनी शेल्डन यांची पुस्तकं वाचण्याकडेही तिचा बराच कल होता.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

सध्याच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मयुरी पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, रणजित देसाई, विश्वास पाटील यांची पुस्तकंही ती आवडीने वाचते. त्यासोबतच तेंडुलकरांच्या नाटकांचंही आपण वाचन केल्याचं तिने सांगितलं आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये वाचनाच्या सवयीमध्ये आलेल्या ट्रेंडविषयी सांगताना मयुरी म्हणाली, ‘मला वाटतं, हल्ली ज्या लेखकांच्या पुस्तकांची चर्चा आहे, ती पुस्तकं फॅड, किंवा मग स्टेटस म्हणून वाचली जात आहेत.’

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com