‘सलमान भाईजान’ असताना मला सख्ख्या भावाची गरज वाटत नाही, असे चक्क बॉलीवूड बादशाहा शाहरुखने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत मैत्रीत कडवटपणा आल्यानंतर हे दोन्ही खान आता पुन्हा एकत्र आले आहेत.
सोशल माध्यमांवर शाहरुख नेहमीच अॅक्टिव असतो. दरम्यान, त्याच्या चाहत्याने त्याला ट्विटरवर एक प्रश्न विचारला की, तुला ख-या आयुष्यातही भाऊ असावा असे वाटले का? यावर शाहरुखने उत्तर दिले की, माझे दोन्ही मुलगे हे माझे मित्र, भाऊ आणि सर्वकाही आहेत. आणि तसही माझ्यासोबत भाईजान तर आहेच. तसेच एका चाहत्याने त्याला विचारले की, तुझ्या पुस्तक लिखाणाचे काम कसे चालू आहे? तुझ्या काय भावना आहेत यासंबंधी.. यास उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, ही खूप खूप मोठी आणि मंदगतीने चालत असलेली प्रक्रिया आहे. स्वतःच्या भावना कागदावर उतरविण्यासाठी वेळ तर लागणारच.
शाहरुखचा ‘दिलवाले’ चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाची प्रसिद्धी चालू असून, काही दिवसांपूर्वी शाहरुख ‘बिग बॉस’च्या मंचावरही गेला होता. यावेळी सलमान आणि शाहरुखने सेल्फी काढून आपल्या चाहत्यांना खूश केले.