हिंदी सिनेसृष्टीतील सातत्याने फ्लॉप होणारे चित्रपट आणि बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या ट्रेंडविरोधात अनेक कलाकार विविध प्रतिक्रिया देत आहेत. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेकांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता विजय देवरकोंडा याच्या वक्तव्यामुळे चाहते संतप्त झाले होते. मुंबईतील ‘गेटी आणि गॅलेक्सी’ या चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टच्या एका वक्तव्यावर चित्रपटगृहाचे मालक संताप व्यक्त करत आहेत.

सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलिया भट्टने बॉलिवूडमधील बॉयकॉट ट्रेंडबद्दल भाष्य केले. त्यावेळी ती म्हणाली, “मी प्रत्येकवेळी मला स्वत:ला सिद्ध करु शकत नाही. जर मी लोकांना आवडत नसेन तर त्यांना माझा चित्रपट पाहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही.” तिच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच मुंबईतील ‘गेटी आणि गॅलेक्सी’ या चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांनीही याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “हा चित्रपट केवळ…” रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर एस. एस. राजामौलींची पहिली प्रतिक्रिया

मनोज देसाई यांनी ‘फ्री प्रेस जनरल’शी संवाद साधताना आलिया भट्टच्या वक्तव्यावर भाष्य केले. त्यात ते म्हणाले, “मला ब्रह्मास्त्रकडून विशेष अपेक्षा नाहीत. लग्नानंतर आलिया भट्टचे काय झाले मला काही माहिती नाही. पण ती फार मूर्खपणासारख्या गोष्टी बोलत आहे. लोक त्यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकत आहेत. त्यांच्या या कमेंटमुळे आगामी चित्रपटावर निशाणा साधला जात आहे. मात्र याचे नुकसान आम्हाला सहन करावे लागणार आहे.”

आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान, प्रोमो आला समोर

दरम्यान अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने या ट्रेलरची सुरूवात होत आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.