दाक्षिणात्या चित्रपटांना हिंदी बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो हे आपण याआधीही अनुभवलं आहे. ‘पुष्षा’, ‘केजीएफ’ सारखे चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहेत. आता ‘कांतारा’ एक दाक्षिणात्य चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २४३ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसह कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं कौतुक केलं. पण दिग्दर्शक अभिरूप बासूने या चित्रपटावर टीका केली आहे.

‘कांतारा’ला मिळालेलं यश पाहता रिषभच्या कामाचं दिग्गज अभिनेत्यांनी कौतुक केलं. रजनीकांत यांनीही या चित्रपट पाहिल्यानंतर अंगावर काटा आला असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र अभिरूपने या चित्रपटाबाबत दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने हा चित्रपट खराब असल्याचं म्हटलं आहे.

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “मला असं वाटतं की काही लोकांच्या बुद्धीमत्तेची या चित्रपटाद्वारे थट्टा करण्यात आली आहे. हा चित्रपट अतिशय खराब आहे. शिवाय अंगावर येणाऱ्या या चित्रपटामधील पात्रही खरी वाटत नाहीत. चित्रपटामध्ये खरेपणा नाही. तिच कंटाळवाणी कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. क्लायमॅक्सनंतर चित्रपट पाहण्याची इच्छा संपते. मला हा चित्रपट पाहण्यामध्ये काही रस नाही.”

आणखी वाचा – रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची जगभर हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदीही चित्रपट पाहणार?

देशभरात या चित्रपटाचं कौतुक होत असताना अभिरूपने चित्रपटावर केलेली टीका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता रिषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. रिषभनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ‘कांतारा’वर टीका करणारा अभिरूप याने आजवर बऱ्याच लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच तो एक लेखकही आहे.